ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जगाभरातील मोठय़ा देशांनी लसींवर रिसर्च करणे, लसी शोधून काढणे यावर वर्चस्व मिळवले. भारत त्यांच्या शोधांवर अवलंबून राहत होता. त्यामुळे भारत या महामारीला कसा तोंड देणार? लस कशी, केव्हा आणि किती प्रमाणात उपलब्ध होणार? असे मोठे प्रश्न देशासमोर होते. मात्र, देशाने यात इतिहासाच्या नव्या पराक्रमाची रचना केली. भारताने गुरुवारी कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचे कठीण लक्ष्य पार केले. त्यामुळे अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना इतर देशांशी करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच भारताला जगभरात एक नवीन ‘फार्मा हब’ म्हणून स्वीकृती मिळाल्याचा दावाही मोदींनी केला.
युद्ध सुरू असताना शस्त्र टाकू नका
देशात 100 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. परंतु उत्सव येत आहेत, त्यामुळे आपण आणखी सतर्क असणे आवश्यक आहे. कवच कितीही आधुनिक असले , ते कितीही चांगले असले तरी जोपर्यंत युद्ध चालू आहे, तोपर्यंत शस्त्रे खाली ठेवली जात नाहीत. जसे तुम्हाला बूट घालून बाहेर जाण्याची सवय झाली आहे, त्याचप्रमाणे मास्क घाला, असेही मोदी म्हणाले.
लसीकरणात व्हिआयपी कल्चर दूर ठेवले
लोकशाही म्हणजे प्रत्येकाचा पाठिंबा. म्हणूनच देशात मोफत लस मोहीम सुरू केली. लसीकरणामध्ये कोणताही भेदभाव केला नाही. व्हीआयपी कल्चर दूर ठेवून विक्रमी लसीकरण करुन दाखविले. यासाठी देशवासियांचेही सहकार्य मोठे होते.