वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना व्हायरसच्या महामारीला समर्थपणे तोंड देण्याकरिता तसेच भारताच्या जनतेला या संकटापासून वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवडय़ांच्या कालावधीसाठी संपूर्ण देश लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या सल्ल्याचा भारतीय नागरिकांनी गंभीरपणे विचार करावा, असे प्रतिपादन भारतीय वंशाचा इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज माँटी पनेसरने केले आहे.
पंतप्रधान मोदी आपल्या देशाच्या जनतेला सुरक्षित आणि सुखरूप राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी यांनी जाहीर केलेल्या या निर्णयाची भारतीय जनतेने तंतोतंत अंमलबजावणी करावी. भारतीय जनतेने आपल्या निवासस्थानी सुखरूप राहावे, असे आवाहन पनेसरने केले आहे. पनेसरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 50 कसोटी आणि 26 वनडे सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2006 साली पनेसरने भारताविरूद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते.