ऑनलाईन टीम / काबुल :
भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानची हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने नागरी उड्डाण मंत्रालयाच्या महासंचालकांकडे (डीजीसीए) पत्राद्वारे केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडून तालिबानच्या या पत्रावर विचार सुरू आहे.
भारताने 15 ऑगस्टपासून अफगाणिस्तानातून व्यावसायिक उड्डाण सेवा स्थगित केली आहे. तिथून भारतीय नागरिकांना आणण्यासाठी बचाव मोहिमेअंतर्गत केवळ काही विशेष विमानांना काबूल विमानतळावर जाण्याची परवानगी देण्यात आली. तथापि, तालिबानने काबुलवर राज्य केल्यापासून भारताने यासंदर्भात तालिबानशी अद्याप कोणताही अधिकृत संपर्क केलेला नाही.
दरम्यान, तालिबानचे हे पत्र सध्याच्या सरकारचे नागरी उड्डाण मंत्री अल्हाज हमीदुल्ला अखुंजादा यांनी लिहिले आहे. हे पत्र 7 सप्टेंबर रोजी पाठविण्यात आले होते. अखुंजादाने त्यात लिहिले आहे की, ‘काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने काबुल विमानतळ खराब आणि अक्षम केलं होतं. परंतु कतार या मित्रराष्ट्राच्या सहाय्याने हे विमानतळ पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आले आहे. 6 सप्टेंबर 2021 रोजी या संदर्भात नोटम (एअरमनना नोटीस) जारी करण्यात आली आहे. त्यामुळे भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा सुरू करावी.’ या पत्राचा उद्देश दोन्ही देशांमधील प्रवासी वाहतूक पूर्ववत करणे आणि आमच्या नॅशनल एअरलाइन्सला त्यांची उड्डाणे पुन्हा सुरू करण्यास सक्षम करणे हा आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.