वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत बायोटेक या कंपनीने आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) अनुमती मागितली आहे. आपत्कालीन वापरासाठी सरकारकडून अनुमती मागणारी भारत बायोटेक आता देशात तिसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी सिरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडियाने रविवारी आपत्कालीन वापराच्या अनुमतीसाठी अर्ज केला होता.
फायजर कंपनीने 4 डिसेंबर रोजी भारतातही आपत्कालीन वापराची अनुमती मागितली आहे. तर भारत सरकारने लससंबंधी आढावा प्रक्रिया गतिमान केली आहे. याप्रकरणी लवकरच निर्णय होऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच पुण्यातील सिरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडिया, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि अहमदाबादच्या कॅडिला हेल्थकेअरमध्ये निर्माण होणाऱया लसींचा आढावा घेत तिन्ही शहरांचा दौरा केला होता. त्याच्या काही दिवसांनी त्यांनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटीज, जेनोवा फार्म्यास्युटिकल्स आणि बायोलॉजिकल ईच्या वैज्ञानिकांसोबत ऑनलाईन बैठक घेतली होती. या तिन्ही ठिकाणी विदेशात निर्मित लसीच्या प्रारंभिक टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत.