शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकरांचा सवाल
प्रतिनिधी / देवगड:
देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत शिवसेनेने आवाज उठविल्यानंतर सभापती रवी पाळेकर यांनी आरोप सिद्ध झाले तर आपण राजीनामा देऊ, असे जाहीर केले होते. आता शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला असून लिपीक निलंबित झाला आहे. चौकशी समितीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही सभापती राजीनामा कधी देतात याची शिवसेना वाट पाहत आहे, अशी टीका शिवसेना देवगड तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी केली. तसेच शिक्षण विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी ही आयुक्त पातळीवरून व्हावी, यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपतालुकाप्रमुख बुवा तारी, शहर प्रमुख संतोष तारी उपस्थित होते. साळसकर म्हणाले, देवगड शिक्षण विभागातील भ्रष्टाचार हा शिवसेनेचे जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी जिल्हाधिकाऱयांना याबाबत निवेदन दिल्यानंतर उघडकीस आला. तोपर्यंत हे प्रकरण दडपण्याचे काम काहीजण करीत होते. मात्र, त्यांची आर्थिक तजवीज न झाल्याने भ्रष्टाचार दडपणारेच आता भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणल्याचा आव आणत आहेत. पंचायत समिती शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचा अधिकार हा केवळ कोकण आयुक्तांना आहे. या प्रकरणाची चौकशी कोकण आयुक्तांमार्फत होणे आवश्यक आहे. या प्रकरणाच्या मुळाशी शिवसेना गेल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना कोकण आयुक्तांमार्फत याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यास भाग पाडून यातील मुख्य सूत्रधार व या प्रकरणातील सत्य बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
देवगड पंचायत समितीच्या एमआरजीएसच्या कामात मोठा भ्रष्टाचार असून 15 ते 19 मे या दरम्यान तौक्ते वादळ व पाऊस असताना चक्क एमआरजीएसच्या कामांची हजेरी दाखवून पैसे लाटले गेले आहेत, असा आरोप साळसकर यांनी केला आहे. हा प्रकार केवळ देवगडच नव्हे तर जिल्हय़ातील पंचायत समितींमधून झालेला आहे. त्यामुळे राणेंना अभिप्रेत असलेले काम निश्चितच जिल्हय़ातील पंचायत समितींमधून होत असल्याची टीका त्यांनी केली.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला देवगड तालुक्यात पावसाचे दिवस असतानाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोविडची रुग्णसंख्या जास्त असलेले पोंभुर्ले, फणसगाव, बापर्डे विभाग वगळता सर्व ठिकाणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात शिवसैनिकांनी घराघरात पाहोचण्याचे काम केले आहे. तौक्ते वादळमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे. शेतकऱयांना व मच्छीमारांना प्रथमच योग्य प्रकारे मदत देण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. देवगड तालुक्यातील तौक्ते वादळातील नुकसान झालेल्या शेतकऱयांपैकी 176 शेतकऱयांच्या यादीची छाननी झाली असून येत्या आठ दिवसांत त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार आहे. तर 72 मच्छीमारांच्या नुकसानीच्या यादीमध्ये त्रुटय़ा असून त्याची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. canoscan_lide_110.html