अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 24 नोव्हेंबर, 2021 सकाळी 11.00
● रूग्णवाढ आटोक्यात आल्याने लग्नसराईत उत्साह
● बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढाल पुन्हा वेगावली
● लसीकरणाचा वेगही कायम ठेवल्याने दिलासा
● गेल्या 24 तासात 23 रूग्ण वाढले
● 2883 संशयित रूग्णांच्या चाचण्या
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यावर मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट घोंगावत होते. गेल्या वर्षी आक्टोबरनंतर पहिली लाट आटोक्यात आली तरी निर्बंधांमधे फारशी शिथिलता नव्हती. दरम्यान दुसरी लाट वेगाने आल्याने जिल्ह्यावर पुन्हा टाळेबंदीची वेळ आली. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जिल्ह्याचे मोठे आर्थिक नुकसान करणारी ठरली. सुदैवाने सप्टेंबरपासून दुसरी लाट ओसरायला सुरूवात झाली असून सध्या नोव्हेंबर महिन्यात रूग्णवाढीचा वेग अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात रखडलेले लग्न सोहळ्यांसह इतर सोहळे सध्या धुमधडाक्यात आणि मंगलमय वातावरणात सुरू आहेत. रूग्णवाढ कमी झाल्याने आणि अपवाद वगळता निर्बंध शिथिल झाल्याने कोरोनामुळे अडचणीत आलेली आर्थिक उलाढाल पुन्हा सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 23 रूग्णांंची वाढ झाली असून 2883 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.
रूग्णवाढीला ब्रेक, लग्नसराईला वेग
पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या लाटेचा मोठा तडाखा सातारा जिल्ह्याला बसला. दुसरी लाट आर्थिक, मानसिक, कौंटूबिक नुकसान करणारी ठरली. कोरोनाच्या महामारीने दोन वर्षापासून विवाह सोहळे रखडले होते. मात्र दिपावलीनंतरही कोरोनाच्या रूग्णवाढीला कमालीचा ब्रेक लागला असून अल्पवाढ सुरू आहे. दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढल्याने ती जमेची बाजू आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात दिपावलीनंतर लग्नसराई धुमधडाक्यात सुरू झाली आहे. लग्न सराईला उपस्थितांच्या मर्यादेचा नियम शिथिल झाल्याने जिल्ह्यातील मंगलकार्यालये, मल्टीपर्पज हॉल, हॉटेल बुकींग होत आहेत. बाजारपेठांमधेही खरेदीची आर्थिक उलाढाल पुन्हा सुरू झाली आहे.
पाऊस, ढगाळ वातावरणाने किरकोळ आजार
कोरोना रूग्णवाढ आटोक्यात आली असली तरी गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह कधी कधी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. तर कधी उन्हाचा कडाका पडत आहे. थंडीच्या दिवसात मुसळधार पावसाचे चित्र आणि कायम राहणारे ढगाळ वातावरण यामुळे वृद्ध आणि लहान मुलांच्यात सर्दी, खोकला, तापाचे आजार वाढले आहेत. मात्र हे वातावरणातील बदलाने होत असल्याचे मत वैद्यकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र तरीही जिल्हावासियांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
लसीकरणातील सुलभता जिल्ह्याच्या पथ्यावर
नोव्हेंबर महिन्यात जसा रूग्णवाढीला ब्रेक लागला तशी लसीकरणाने चांगलीच गती घेतली आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात एकूण 30 लाख 645 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 19 लाख 97 हजार 663 एवढी असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 10 लाख 982 एवढी झालेली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही वाढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,83,785
एकूण बाधित 2,51,882
कोरोनामुक्त 2,44,310
एकूण मृत्यू 6,473
सक्रीय रुग्ण 264
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 23
मुक्त 71
मृत्यू 00, उशिरा नोंद 2