प्रतिनिधी/ मंडणगड
रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्याने शेतकरीवर्ग शेतीपूर्व मशागतीला लागला असून काही ठिकाणी पावसाची चाहूल लागल्याने शेतकऱयांनी पेरणीला सुरूवात केली आहे. सकाळ व संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी बळीराजा सर्जा-राजाला घेऊन नांगरणी करताना दिसत आहे, तर प्रगतशील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत ट्रक्टरच्या सहाय्याने शेत नांगरणी करताना पहायला मिळत आहे.
रोहिणी नक्षत्र 25 मेपासून सुरू झाले आहे. गुरुवारपासून शेतकऱयांनी पेरणीला सुरूवात केली. महिला नांगरणी केलेल्या शेतातील ढिपळय़ा फोडून माती सारखी करण्यात मग्नग्न झाल्या आहेत. बहुतांशी शेतकरी मागील वर्षात उत्पन्न घेतलेल्या भाताचे बियाणे पेरणीसाठी वापरत आहेत, तर काहीजण नवीन बियाण्यांचा वापर करू लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पेरणी सुरू राहणार आहे. त्यानंतर पावसाच्या प्रमाणावर लावणीचा हंगाम सुरू होतो. शेतकऱयांचे शेतीचे वार्षिक चक्र ठरलेले असते. पाडव्यानंतर सर्वच ठिकाणी कवळतोडणीचे काम सुरू झाले होते. त्यानंतर भाजावळीच्या तयारीला सुरूवात झाली. एप्रिलमध्ये भाजावळ करून मे महिन्यात शेतीची मशागत सुरू झाली.
रोहिणी नक्षत्रानंतर पेरणी, जूनच्या शेवटी लावणी, त्यानंतर दोन महिने भातशेतीची मशागत, दिवाळीनंतर कापणी, डिसेंबरमध्ये भातझोडणी करून शेतकरी जानेवारीदरम्यान आपल्या वार्षिक कालचक्रातून मुक्त होतो. आता पेरणीच्या दृष्टीने शेतकरी तयारीला लागला आहे. महिला शेतामध्ये मशागत करत असून पुरुष नांगर तयार करून घेणे, बैलजोडीची तरतूद करणे, फाळाला धार लावणे, इतर शेती औजारे तयार करून घेणे या कामांमध्ये व्यस्त आहे. सध्या विविध कृषी केंद्रांवर भातबियाणे खरेदी सुरू झाली आहे. भातबियाण्यांप्रमाणेच खतांची मागणी नोंदवली जात आहे. यावर्षीचा पावसाळा वेळेत सुरू होणार की उशिरा, याचे अंदाज बांधले जात आहेत.
शेती क्षेत्र वाढण्याची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक कुटुंबे गावी आली आहेत. मुंबईत दैनंदिन कामकाज सुरू होण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे असेच घरी बसून राहण्यापेक्षा शेती करण्याची मानसिकता चाकरमान्यांची बनली आहे. परिणामी यावर्षी शेती क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस अन् किडीचा प्रादुर्भाव
गतवर्षी अवकाळी पाऊस आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले. तयार पिके शेतात आडवी झाल्याने त्यांची पुन्हा रुजवत झाली होती. मात्र अशा घटनांनी कोलमडून न पडता येथील शेतकरी पुन्हा शेतात राबू लागला असून चांगल्या पिकाची अपेक्षा बाळगून कामाला लागला आहे…..