सातारा / प्रतिनिधी :
राज्यातील धार्मिक स्थळे, देवी-देवतांना बंदिस्त करुन लाखो गरीबांची उपासमार चालू आहे. याबद्दल ठाकरे सरकारचा निषेध करण्याकरिता भाजपाच्यावतीने सुरू असलेले राज्यव्यापी शंखनाद आंदोलन सातारा शहरातही करण्यात आले.
मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि महिला मोर्च्या प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, सातारा शहरच्या वतीने सोमवारी (३० ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजता आनंदवाडी दत्त मंदिरासमोर आणि तुळजाभवानी मंदिरासमोर टाळ, घंटा व शंख वाजवून आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे. सध्या महाराष्ट्रात सर्व काही व्यव्हार सुरुळीत चालू आहेत. त्यात बाजार पेठ, दारुची दुकाने, नेत्यांच्या सभा यासह सर्वांना परवानगी आहे. सरकार शाळासुद्धा चालू करण्याच्या तयारीत आहेत. फक्त मंदिर बंद आणि भजन कीर्तनाला परवानगी नाही. मग मंदिर आणि धार्मिक कार्यक्रमातच कोरोनाची वाढ होते का? हा प्रश्न उपस्थित करत मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी, यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले.
या वेळी सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, महिला मोर्च्या जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, सातारा शहर सरचिटणीस प्रविण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, वैशाली टंगसाळे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे आदी उपस्थित होते.