वार्ताहर/ राजापूर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) राज्यातील ग्रामीण भागामध्ये 1 लाख किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते व इतर खडीकरणाच्या रस्त्यांची निर्मिती करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. त्याचप्रमाणे ‘मनरेगा’मधून ‘हरघर गोठे-घरघर गोठे’ उपक्रमही राबविण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतीच याची घोषणा केली आहे. या उपक्रमांमुळे गावांमध्ये रोजगार निर्मितीला अधिक बळकटी येणार असून शेतकऱयांचेही जीवनमान उंचाविण्यासाठी मदत होणार आहे.
मनरेगांतर्गत घेण्यात येणाऱया महत्वाच्या एकूण 90 कामांमध्ये रस्ता खडीकरण, विशेषत: पाणंद रस्ते तयार करणे या कामाचा समावेश करण्यात आला आहे. योजनेतील अभिनव उपक्रमाद्वारे मागेल त्याला काम मिळेल, लोकांचे स्थलांतर थांबविले जाईल, कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावेल, शेतकरी स्वावलंबी होईल आणि गावे समृध्दीकडे वाटचाल करतील. तसेच ही कामे घेतल्यास वैयक्तिक कामांबरोबर सामूहिक कामे घेऊन गावांचा विकास साधला जाईल.
राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेली कामे ही ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व शाश्वत विकासाच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरली आहेत. सद्यस्थितीत सुरु असलेल्या कोवीड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर ही योजना रोजगार निर्मिती करणे त्याचबरोबर शेतकऱयांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी लाभदायी ठरणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी या योजनेंतर्गत पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेप्रमाणे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रस्तावित करुन ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे, अशा सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषदेने या योजनेंतर्गत ‘हरघर गोठे-घरघर गोठे’ उपक्रम यशस्वीपणे राबविला असून कोल्हापूर जिल्हा परिषदेने पाणंद रस्ते निर्मिती व रस्ते खडीकरण करणे प्रस्तावित केले आहे. ‘हरघर गोठे-घरघर गोठे’ या उपक्रमांतर्गत गाय-म्हैस यांच्याकरीता गोठय़ात पक्के तळ, गव्हाण आणि मूत्रसंचय टाकी बांधणे, बचतगटांच्या जनावरांसाठी सामूहिक गोठे बांधणे, कुक्कुटपालन शेड (निवारा) बांधणे, शेळीपालन शेड इत्यादी मत्तेची निर्मिती करण्यात येत आहे.
या कामामध्ये केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे कुशल-अकुशल प्रमाण योग्य राखण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याने गोठय़ाच्या कामाबरोबरच बांधावर किंवा क्षेत्रावर कमीत कमी 20 ते 50 फळझाडांचे किंवा वृक्षलागवडीचे मनरेगाअंतर्गत अतिरिक्त काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गावामध्ये पाणंद रस्ते निर्मिती व रस्ते खडीकरणाची कामे घेण्यात यावीत. या कामांबरोबरच मृद व जलसंधारण, गाळमुक्त धरणांची कामे, घरोघरी शोषखड्डे व घरकुल बांधणे इत्यादी कामेसुध्दा या योजनेंतर्गत घेता येणार आहेत.