प्रतिनिधी /पणजी
मंत्रीपदाची शपथ घेऊन तब्बल 13 दिवसानंतर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन पदाचा ताबा घेतला. आता तारीख पे तारीख असणार नाही तर मुंडकार प्रकरणे अवघ्या 6 महिन्यात निकाली काढण्यासाठी आपण पुढाकार घेणार असे मंत्री मोन्सेरात यांनी जाहीर केले.
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मंत्रालयात जाऊन कॅबिनचा ताबा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री या नात्यानेच असे नव्हे तर आपल्याकडे असलेल्या सर्व खात्यांप्रकरणी जनतेला आपण न्याय देणार आहे. सध्या 16000 मुंडकार प्रकरणे प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण शिकस्तीने प्रयत्न करणार आहे. तारीख पे तारीख देऊन प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांशी आपण सविस्तर बोलेन आणि या प्रकरणी तोडगा काढला जाईल, जेणेकरून प्रत्येक प्रकरणावर 6 महिन्यात निर्णय झाला पाहिजे.
मामलेदार आणि जिल्हा प्रशासनातील कामकाज व कारभारात आता बदल करणे आवश्यक आहे. जनतेला न्याय मिळायचा असेल तर मुंडकार प्रकरणांवर 6 महिन्यांत तोडगा निघणे आवश्यक आहे. आपला प्रयत्न त्या दिशेने राहील, असे मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले.