प्रतिनिधी / बेळगाव
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असताना संपूर्ण शहर अंधाराच्या विळख्यात सापडले आहे. एकीकडे स्मार्ट रोड करण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे आणि दुसरीकडे बंद व नादुरुस्त पथदीप आहेत. कोटय़वधी निधी खर्चून प्रत्येक रस्त्यावर उभारण्यात आलेले पथदीप बंद असल्याने शहरवासियांना खड्डेमय रस्त्यावरून चाचपडत प्रवास करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंधाराच्या विळख्यात सापडली आहे.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्यावर बसविण्यात आलेले पथदीप बंद आवस्थेत आहेत. रस्त्याच्या विकासासाठी ठिकठिकाणी खोदाई करण्यात आल्याने पथदीपाच्या विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. त्याची जोडणी करण्याकडे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या कंत्राटदाराचे व अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. महात्मा फुले रोड, कॉलेज रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, एपीएमसी रोड, बसवेश्वर चौक ते बॅ. नाथ पै चौक पर्यंतचा रस्ता, एसपीएम रोड, बॅ. नाथ पै चौक ते येळ्ळूर कॉर्नर रोड, आरपीडी रोड, टिळकवाडी भागातील विविध रस्त्यावरील पथदीप पूर्णपणे बंद आहेत. सदर रस्त्यावर स्मार्ट सिटी योजनेंतर्गत खोदाई करण्यात आल्याने पथदीपांच्या विद्युत वाहिन्या खराब झाल्या आहेत. त्याची पुनर्रजोडणी करण्यात आली नसल्याने या रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारक व नागरिकांना धोकादायक बनले आहे. एकीकडे अर्धवट झालेली रस्त्याची कामे तर दुसरीकडे पथदीपाअभावी अंधार अशा स्थितीत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे शहरातील काही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्व रस्ते खड्डेमय बनले असून, अंधाराच्या विळख्यात सापडलेल्या शहरामधील रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना चाचपडत जाण्याची वेळ आली आहे. पथदीपांच्या दुरुस्तीबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण केंद्रात दररोज असंख्य तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र याची दखल घेतली जात नाही. एखादा पथदीप सुरू करून दुरुस्ती केल्याचे सांगून दुर्लक्ष केले जाते. वास्तविक पाहता प्रत्येक रस्त्यावर असंख्य पथदीप बंद अवस्थेत आहेत.