तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडून चौकशीचे आश्वासन
शिरोळ /प्रतिनिधी
जुलै 2019 मध्ये आलेल्या महापुरात शासनाकडून आलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याची चौकशी करावी,दोषींवर फोजदारी कारवाई करावी,पंचनामे बोगस करून अनुदान लाटलेल्यांची वसूली करावी आणि लाभापासून वंचित राहिलेल्याना अनुदान मिळावे. या मागणीसाठी आज अब्दुललाटच्या शंभर पेक्षा जास्त ग्रामस्थांनी तहसीलदार कचेरीत ठिय्या आंदोलन केले.
आंदोलक आक्रमक झाल्याने आणि चौकशीचा आदेश मिळाल्याशिवाय हलणार नाही असा पवित्रा घेतल्याने शिरोळ च्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी लॉक डाऊन संपताच चौकशी करण्याबाबत लेखी आदेशाचे पत्र दिल्याने वातावरण निवळले आणि ठिय्या आंदोलन थांबवण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते प्रा. संजय परीट, डॉ. दशरथ काळे आणि शेतकरी नेते विद्याधर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गेली. 24 दिवस या मागणीचा पाठपुरावा सुरू होता, तहसीलदारांच्या लेखी आदेशाने आज आंदोलकांना न्याय मिळवून आंदोलन यशस्वी झाल्याचे सांगितले.
आज झालेल्या ठिय्या आंदोलनाला शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुगे, कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते रामचंद्र डांगे, वंचित आघाडीचे सुनील खोत, उपसभापती मल्लू खोत, आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे, सुरेश सासणे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.
आंदोलक न्याय मिळेपर्यंत ठिय्या उठवायचा नाही या हेतूने घरची भाजी भाकरी घेऊनच आले होते. त्यांनी कचेरीच्या आवारातच दुपारची भाकरी खाल्ली. गेली 24 दिवस सुरू असलेले हे आंदोलन अखेर चौकशीचे लेखी पत्र मिळाल्याने यशस्वी झाले.