ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. विकेंड लॉकडाऊन देखील सुरू झाले आहे, तरी देखील रुग्ण संख्या काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. मागील 24 तासात राज्यात 58 हजार 993 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. तर 301 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 32 लाख 88 हजार 540 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 57 हजार 329 एवढा आहे.

कालच्या एका दिवसात 45,391 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 26 लाख 95 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.96 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.74 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 34 हजार 603 रुग्ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 16 लाख 31 हजार 258 नमुन्यांपैकी 15.2 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 26 लाख 95 हजार 065 क्वारंटाईनमध्ये असून, 24 हजार 157 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.