ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात रविवारी एका दिवसात 6555 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 151 जणांचा मृत्य झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 06 हजार 619 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
रविवारी एका दिवसात 151 मृत्यूंची नोंद झाली. त्यातील 69 मृत्यू हे एकट्या मुंबईमधील आहेत. सध्या राज्यात मृत्युदर 4.49 टक्के आहे. तर राज्यात एकूण 86 हजार 040 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 12 हजार 442 नमुन्यांपैकी 2 लाख 06 हजार 619 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 04 हजार 463 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 46 हजार 062 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
त्यातच, दिलासादायक बाब म्हणजे रविवारी एकूण 3 हजार 658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.8 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 740 लोकं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.