ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जास्त रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटकसह 10 राज्यात घरोघरी आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे.
आरोग्य विभागाच्या सचिव प्रीती सुदान यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विविध 45 महापालिकांमधील जिल्हा रुग्णालय अधीक्षक यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
स्वराज्य संस्थांच्या मदतीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, उत्तराखंड, जमू-काश्मीर या 10 राज्यातील 38 जिल्ह्यात स्वराज्य संस्थांच्या मदतीने हे सर्वेक्षण केले जाईल. या निर्णयामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे.
देशात दररोज जवळपास 10 हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये या 10 राज्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पुढील काळात जिल्हानिहाय नियोजन करावे, कंटेन्मेंट झोनमध्ये केसेसचे व्यवस्थापन आणि बफर झोनमध्ये काटेकोर निगराणी कशी राखावी, याचेही सल्ले या राज्यांना या बैठकीदरम्यान देण्यात आले.