जि. प. आरोग्य समिती सभेत माहिती : आरोग्य यंत्रणेवर दुहेरी ताण : सात लाख लोकांचा सर्व्हे
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा माकडताप रोगाचा सामना करीत आहे. परिणामी जिल्हय़ाच्या आरोग्य यंत्रणेवर दुहेरी ताण आला आहे. माकडतापाचे नव्याने 35 रुग्ण आढळले आहेत. यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. पैकी तिघांचा मृत्यू गोव्यातील बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये, तर एकाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला आहे.
जि. प. आरोग्य सभापती सौ. सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झालेल्या आरोग्य समिती सभेत ही माहिती देण्यात आली. सभेला सदस्य उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी खोबरेकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कोरोनासंदर्भात आढावा घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्यावतीने 6 लाख 87 हजार 679 लोकांचा सर्व्हे करण्यात आला. यातील 3 हजार 729 लोकांना सर्दी व खोकला ही कोरोनाची असलेली लक्षणे आढळून आली. हे सर्व रुग्ण आता व्यवस्थित आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
55 रुग्ण आयसोलेशनमध्ये
आतापर्यंत 124 रुग्णांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. यातील 69 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर 55 रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत 144 रुग्णांचे कोरोना नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एकच नमुना पॉझिटिव्ह आला होता. 103 नमुने निगेटिव्ह आले असून 40 नमुने प्रलंबित आहेत, अशी माहिती देण्यात आली.
आशांच्या माध्यमातून चारवेळा गृहभेटी
आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून महिन्यातून चारवेळा गृहभेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका आशा स्वयंसेविकेकडे एक हजार घरे दिली आहेत. दिवसाला 50 गृहभेटी द्यायच्या आहेत. यासाठी त्यांना नियमित मानधनाव्यतिरिक्त केंद्र सरकार व जिल्हा परिषद विशेष अनुदान देणार आहेत. एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी हे अनुदान असून केंद्र सरकार दोन हजार रुपये, तर जिल्हा परिषद एक हजार रुपये देणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने साथ रोग अंतर्गत 10 लाख रुपयांची विशेष तरतूद केली आहे, अशी माहिती डॉ खलिपे यांनी दिली.
संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये जबाबदारी महसूलची
संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये योग्य त्या सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या बाबीकडे हरी खोबरेकर यांनी लक्ष वेधले. जिल्हय़ात तयार करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये केवळ आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेची आहे. यामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना जेवण पुरविणे, स्वच्छता राखणे, साहित्य पुरविणे ही जबाबदारी महसूल विभागाची आहे, असे यावेळी डॉ खलिपे यांनी सांगितले.
आंबा वाहतूक करणाऱयांची होणार नोंद
आंबा वाहतूक करणाऱया वाहनातून हायरिस्क असलेल्या पुणे, मुंबई येथील नागरिकांची जिल्हय़ात वाहतूक करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदच्या आरोग्य यंत्रणेने आंबा वाहतूक करणाऱया वाहनांच्या चालकांचे नंबर घेऊन अशी वाहतूक होत असल्यास त्याबाबतची नोंद ठेवण्याचे आदेश सभापती लोके यांनी प्रशासनाला दिले.
तक्रार कृती समितीने करावी
हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणचे नागरिक ग्रामीण भागात दाखल होत आहेत. अशा व्यक्तींची तक्रार आरोग्य विभागाने पोलिसात करावी, अशी मागणी खोबरेकर यांनी केली. यावर बोलताना डॉ खलिपे यांनी, जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी गुंतलेली आहे. यावेळी त्यांना पोलीस तक्रारीसारख्या विषयात गुंतवता येणार नाही. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार गावागावात स्थापित झालेल्या कृती समितीमधील तलाठी, ग्राम सेवक, पोलीस पाटील यांनी तक्रार करावी, असे त्यांनी सांगितले.