वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गलवान खोरे तसेच पँगोंग सरोवर भागातून सैनिकांना मागे घेणे तसेच बफर झोन तयार करणे भारताच्या अधिकारांचे ‘आत्मसमर्पण’ असल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच माजी संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी रविवारी केला आहे. सीमेवर अनेक आव्हानांना सामोरे जात असताना तसेच दोन आघाडय़ांवर युद्धसदृश स्थिती असताना संरक्षण अर्थसंकल्पात किरकोळ तसेच अपुरी वृद्धी करण्याचा प्रकार देशासोबत विश्वासघात असल्याचे अँटनी म्हणाले.
चीन आक्रमक होताना आणि पाकिस्तानकडून दहशतवादाला बळ मिळत असताना मोदींचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेला योग्य प्राथमिकता देताना दिसून येत नाही. सैनिक मागे हटल्याने तणाव कमी होणार आहे, पण हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेच्या किमतीवर उचलण्यात येऊ नये असे उद्गार अँटनी यांनी काढले आहेत.
गलवान खोरे तसेच पँगोंग सरोवर भागातून सैनिकांची माघार आत्मसमर्पणासारखेच आहे. पारंपरिक स्वरुपात या भागांना भारत नियंत्रित करत राहिल्याने हे आत्मसमर्पणच आहे. 1962 मध्येही गलवान खोरे भारतीय क्षेत्र असल्याबद्दल वाद नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे.
पाकिस्तानला चीनची मदत
सैनिकांची ही वापसी आणि बफर झोन निर्माण करण्याचे महत्त्व सरकार जाणून घेत नसावे. चीन कुठल्याही क्षणी पाकिस्तानला सियाचीनमध्ये मदत करण्यासाठी आगळीक करू शकतो. सीमेवर जैसे थे स्थिती बहाल करण्यात सरकारने देशाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय नेत्यांशी सल्लामसलत
सरकारने असा निर्णय घेण्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सल्लामसलत करावी आणि राष्ट्रीय सुरक्षा विचारात घ्यावी. सरकारने चीनचे ‘तुष्टीकरण’ करणे तसेच संघर्ष इच्छित नसल्याचा संदेश देण्यासाठी संरक्षणाची तरतूद वाढविली नसल्याचा आरोप अँटनी यांनी केला आहे.