पहिल्या विधानसभेत उपसभापती : भाऊसाहेबांच्या मंत्रीमंडळातील मंत्री
प्रतिनिधी / पणजी
मुक्त गोव्याचे शिल्पकार स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात मंत्री राहिलेले अच्युत शेणवी उसगावकर यांचे वृद्धापकाळाने 92 व्या वर्षी काल मंगळवारी 16 जून रोजी करंजाळे पणजी येथे राहत्याघरी निधन झाले. अंत्यसंस्कार सायंकाळी पणजीत सांत ईनेज स्मशानभूमीत पार पडले.
उसगावकर यांच्या पश्चात पत्नी माणिक तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, डॉ. तोषा कुराडे व सौ. मनिषा दिनार तारकर अशा तीन कन्या आहेत. उसगावकर यांच्या पार्थिवावर सायं. 4 वाजता सांत ईनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते हे मूळ उसगाव येथील होते. 15 सप्टेंबर 1928 रोजी खानापूर (कर्नाटक) येथे त्यांच जन्म झाला होता.
पाळी मतदारसंघातून तीनदा विजयी
गोवा मुक्तीनंतर 1963 मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत ते पाळी (आताच्या सांखळी) मतदारसंघातून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या उमेदवारीवर विजयी झाले होते. त्यानंतर 15 जानेवारी 1964 रोजी ते गोवा दमण दीव विधानसभेचे उपसभापती बनले. 28 मार्च 1964 पर्यंत ते या पदावर होते. 1966 च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा पाळी मतदारसंघातून विजयी झाले. मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात वित्तखात्याचे उपमंत्री बनविले होते. 1972 मध्ये झालेल्या तिसऱया विधानसभेसाठी त्यांना मगोने पुन्हा पाळी मतदारसंघात उभे केले असता विजयी झाले होते.
भाऊसाहेब, शशिकलाताईच्या मंत्रीमंडळात स्थान
भाऊसाहेब बांदोडकरांच्या तिसऱया मंत्रिमंडळात कृषी व पशूसंवर्धन व कायदा मंत्रिपदी त्यांनी काम केले. 1973 मध्ये भाऊसाहेबांच्या निधनानंतर मुख्यमंत्री बनलेल्या भाऊसाहेबांच्या कन्या शशिकलाताई काकोडकर यांच्या मंत्रिमंडळातही उसगावकर हे पुन्हा मंत्री बनले होते.
राजकारणात उतरण्यापूर्वी गोवा मुक्ती लढय़ातही स्व. अच्युत उसगावकर हे सहभागी झाले होते. शांत व सुस्वभावी अशी त्यांची ओळख होती. 1977 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पाळीमध्ये पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणापासून दूरच झाले.
मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
उसगावकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी 92 वर्षीय उजगांवकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मंगळवारी सकाळी इस्पितळात त्यांचे निधन झाले. त्यांनी दिलेले योगदान सतत स्मरणात राहील, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आपल्या दुखवटा संदेशात शोकग्रस्त कुटुंबियांप्रती आपली सहानुभूती व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेत्यांना दुःख
गोवा, दमण व दीवचे माजी मंत्री अच्युत उजगांवकर यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी उसगावकर यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे. अत्यंत साधी राहणी, नम्र व दयाळु स्वभाव यामुळे त्यांनी अनेक मित्र जोडले होते. त्यांच्या परिवाराशी माझा जवळचा सबंध होता, असेही कामत यांनी म्हटले आहे.
सदानंद मळीक यांना दुःख
पाळीचे माजी आमदार व माजीमंत्री सदानंद मळीक यांनी सांगितले की अच्युत उसगावकर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे गोमंतकीयांची सेवा बजावलेली आहे. शांत व मनमिळावू असे थोर व्यक्तिमत्व गोव्याने गमावल्याची ते म्हणाले.
स्वच्छ व प्रामाणिक नेता गमाविला ः किरण ठाकुर
माजी मंत्री अच्युत उसगावकर यांच्या निधनाने एक सच्चा मित्र तथा गोव्याने एक स्वच्छ व प्रामाणिक नेता गमावल्याची प्रतिक्रिया ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केली आहे. उसगावकर यांनी गोवा मुक्ती लढय़ातही भाग घेऊन या राज्यापोटी आपले फार मोठे योगदान दिले होते. मुक्तीनंतरच्या सरकारात ते भाऊसाहेब बांदोडकरांबरोबर होते. त्यांच्याबरोबर अनेकवेळा गप्पाटप्पा व्हायच्या. त्यावेळी ते आपल्या जुन्या काळातील सर्व आठवणी सांगायचे. अत्यंत प्रामाणिक, शांत स्वभावाचे व स्वच्छ चारित्र्याचे असे हे नेते व आमचे मित्रही होते. त्यांच्या निधनाने आपल्याला दुःख झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी आपण प्रार्थना करतो, असेही किरण ठाकुर यांनी म्हटले आहे.
तत्वनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व पडद्याआड : खलप
मृदुभाषि, सत्शील, आणि तत्वनि÷ राजकीय व सामाजिक व्यक्तीमत्व आज काळाच्या पडद्याआढ गेलं, अशा शब्दात माजी कायदामंत्री रमाकांत खलप यांनी अच्युतराव उसगावकर यांना श्रद्धांजली वाहिली. ते भाऊसाहेब बांदोडकरांचे राजकारणातले अत्यंत निःस्वार्थी सहकारी होते. आमदारानी बंडखोरी करून भाऊंचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा गंभीर आजारी असलेले अच्युतराव व्हीलचेअरवरून सभागृहात आले. स्वताः ज्ये÷ मंत्री असूनही भाऊ नंतर स्व. शशिकलाताई काकोडकर यांना मुख्यमंत्री करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. भाऊंच्या जागी मांदे मतदारसंघातून माझी निवड झाल्यानंतर मला त्यांचे निर्व्याज प्रेम आणि मार्गदर्शन लाभले, असेही खलप यांनी म्हटले आहे.