खानापूर तालुक्यात समितीच्या एकीसाठी प्रतिसाद देण्याचा बैठकीत निर्णय : खानापूर युवा समितीच्या स्थापनेमुळे नवचैतन्य
वार्ताहर /खानापूर
गेले वर्षभर म. ए. समितीशी अलिप्त राहून गेल्या आठवडय़ात राष्ट्रीय पक्षात प्रवेश केलेले खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांच्या निषेधाचा ठराव सर्वांच्यावतीने संमत करण्यात आला. बुधवारी खानापूर येथील राजा शिवछत्रपती स्मारकात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक तालुका समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटाने 1 मार्च रोजी बैठक घेऊन एकीसंदर्भात त्रिसदस्यीय समिती नेमून एकीची प्रक्रिया पुढे नेण्याचा जो प्रस्ताव दूरध्वनीद्वारे आबासाहेब दळवी यांनी कळविला आहे, त्यासंदर्भात आपण प्रतिसाद देण्यास काहीच हरकत नाही व तालुका समितीने दहा सदस्यांची एक समिती नेमून त्या समितीसमोर दिगंबर पाटील यांच्या त्रिसदस्यीय समितीने एकीसंदर्भात विषय मांडावा. तसेच तारखेसंदर्भात जो अल्टिमेटम दिला आहे तो चुकीचा असून ज्यांना खरोखरच एकी हवी असेल त्यांनी संवादाने वेळ-काळ ठरवावा, असे कार्याध्यक्ष मारुती परमेकर यांनी सांगितले.
खानापूर तालुक्मयात खानापूर युवा समितीची स्थापना करून युवकांनी एक नवचैतन्य निर्माण करून विविध कार्यात सहभाग दर्शविला. मराठी संस्कृती, भाषा किंवा नागरिकांच्या इतर समस्यांसंदर्भात आवाज उठवून त्यांनी जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे. या एकीच्या प्रक्रियेत युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील व इतर सदस्यांना स्थान देण्यात यावे, असे मत उपाध्यक्ष गोपाळ पाटील यांनी मांडले.
तालुक्मयात एकी ही मराठी माणसाच्या न्याय हक्क व अस्मितेसाठी आवश्यक असल्याचे मत सचिव गोपाळराव देसाई यांनी मांडले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमा भागातील शिखर समिती असून त्यांच्या अधिपत्याखाली एकी होत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे, असे मत रणजीत पाटील यांनी मांडले, जोपर्यंत समोरासमोर चर्चेला सुरुवात होत नाही तोपर्यंत व्यापक बैठक बोलावयाचा प्रश्नच येत नाही. एकीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच तालुक्मयात जागृती करूनच एक भव्य व्यापक बैठक बोलवावी व राष्ट्रीय पक्षात गेलेल्यांचा निषेध नोंदवावा, असे मत पांडुरंग सावंत यांनी मांडले.
दिगंबर पाटील गटाने एकीसाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमली ती जर चर्चेसाठी येत असेल तर त्यांचे स्वागतच व्हायला हवे. मात्र, यापुढे समितीत राहून राष्ट्रीय पक्षाशी जे संधान बांधून राहतील त्यांनाही घरचा रस्ता दाखवावा, असे मत सुरेश देसाई यांनी यावेळी मांडले.
तालुका समितीच्या दोन्ही गटांमध्ये एकी होणे काळाची गरज असून संवादाने याला भक्कम स्वरूप यावे, असे मत युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मांडले.
या बैठकीला सूर्याजी पाटील, संभाजीराव देसाई, सदानंद पाटील, राजू पाटील, प्रतीक देसाई, विनायक सावंत, पुंडलिक पाटील (करंबळ), रामचंद्र गावकर, अजित पाटील, रवी पाटील, पुंडलिक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.