चिमुकल्या मुलांसाठी बनले ‘लाडके चाचा’
तेजस देसाई / दोडामार्ग:
देश स्वतंत्र होऊन 72 वर्षे झाली. इंग्रजांच्या जुलमी गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो तरी भारताबाहेरील परकीय शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी आपल्या भारतीय सैन्याला दिवसाचे 24 तास, रात्रंदिवस कडक पहारा द्यायला लागतो. शत्रूच्या आक्रमणाची दहशत असल्याने ऊन, थंडी, वारा, पाऊस यांचा विचार न करता, आपल्या कुटुंबियांपासून लांब राहून देशाचं संरक्षण करणं हे प्रथम कर्तव्य समजणाऱया सैनिकांबद्दल तुम्हा-आम्हा सर्वांनाच आदर आहे. दोडामार्ग तालुक्यात आपले देशसेवेचे कार्य चोख बजावून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या ‘कोरोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवरील एका नव्या कार्याने त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे. त्यांनी परप्रांतीय कामगारांना धान्य दिलेच. पण, छोटय़ा – छोटय़ा मुलांची व्यथा जाणून त्यांच्यासाठी खास ‘खाऊ किट’ दिले. त्यामुळे चिमुकल्यांचे ते ‘लाडके चाचा’ बनले.
तालुक्यातील सेवानिवृत्त पॅप्टन कृष्णा गवस, सेवानिवृत्त हवालदार भिकाजी कोकरे, सेवानिवृत्त सुभेदार राजन नाईक, सेवानिवृत्त सुभेदार जयराम सावंत, सेवानिवृत्त सुभेदार डांगी आदी माजी सैनिक ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या संपर्कात आले. आपणाला सामाजिक काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भारतमाता की जयचे अध्यक्ष श्रीगणेश गावडे व निवृत्त पॅप्टन कृष्णा गवस यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन समिती स्थापन करण्यात आली. शासनाला जेव्हा गरज लागेल, तेव्हा हाक द्या, असे पत्रही त्यांनी तहसीलदार व पोलीस ठाण्याला दिले. त्यानंतर त्यांनी गरजूंसाठी धान्य वाटप कार्यक्रम हाती घेतला.
व्यथा पाहून झाले व्यथित
श्री. गावडे व श्री. गवस यांनी ‘तरुण भारत’ मध्ये रस्ता कामगार व परप्रांतियांची होणारी परवड याचे वृत्तांकन वाचले व त्यांनी दोडामार्ग कार्यालयाशी संपर्क केला. त्यानंतर त्यांना अशा वस्तींची माहिती देण्यात आली. ते लागलीच कामाला लागले. जवळपास चार वस्तीत त्यांनी गरजूंना धान्य वाटप केले. हे करीत असताना त्यांच्या एक बाब निदर्शनास आली आणि ते सुन्न झाले. आम्ही कुटुंबांना धान्य दिले खरे. पण, छोटय़ा मुलांचे काय?. असा प्रश्न त्यांना अस्वस्थ करू लागला. त्यांनी या विषयी सर्व कमिटीची बैठक घेतली. यामध्ये छोटय़ा मुलांना ‘स्पेशल खाऊ कीट’ देण्याचे ठरले. दूधासह आवश्यक खाऊ असणारे सामान लहान मुलांना दिले. जोपर्यंत लॉकडाऊन असेल, तो पर्यंत टप्प्याटप्प्याने आपण असे वाटप करू, असे पॅप्टन गवस व गावडे यांनी सांगितले. चिमुकल्या मुलांना सगळेजण घरात का आहेत, याचा थांगपत्ता नसतो. मात्र, हातात खाऊ पडले की त्यांच्या आनंदाला पारावर नसतो. याचा अनुभव व माजी सैनिकांची अनोखी माणुसकी यानिमित्ताने समोर आली.