प्रतिनिधी /मडगाव
मार्ग अभियान या संस्थेचे संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कोकणी साहित्यिक तसेच प्रखर गांधी व नेहरू विचारसरणीचे प्रणेते गुरूनाथ शिवाजी केळेकर (91) यांचे काल मंगळवारी पहाटे 4 वाजता पणजीत त्याची कन्या डॉ. चित्रा जुवारकर यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. स्व. केळेकर हे मुळचे प्रियोळ गावचे मात्र ते मडगावात स्थायिक झालेले होते.
आज बुधवारी सकाळी 9 वा. मडगावातील (जुन्या श्री हरिमंदिरासमोरील लोटलीकर इमारतीत) निवासस्थांनी त्यांचे पार्थिक आणले जाईल. या ठिकाणी स्व. गुरूनाथ केळेकर यांच्या चाहत्यांना अंत्यदर्शन घेता येईल. यावेळी कोरोना मार्गदर्शन तत्वाचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन मार्ग अभियान तर्फे करण्यात आले आहे. त्यानंतर 11.30 वा. मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्च्यात विवाहित कन्या डॉ. संजीवनी केणी, डॉ. चित्रा जुवारकर तसेच पूत्र डॉ. समीर केळेकर असा परिवार आहे.
70 हजार विद्यार्थ्यांकडे संपर्क साधला
21 वर्षांपूर्वी गुरूनाथ केळेकर यांनी स्व. मधुकर मोर्डेकर, स्व. वसंत कारापूरकर, माणिकराव गावणेकर तसेच आपल्या इतर साथीदारांना सोबत घेऊन मार्ग ट्रस्टची स्थापना केली. रस्त्यावरील वाढत्या अपघातांवर थोडा तरी काबू मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रस्ता अपघातात एखाद्या व्यक्तीचा बळी गेला की ते अस्वस्थ व्हायचे. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयांत सामाजिक कर्तव्यांची जाणीव निर्माण करून देवून त्यांच्यामधून नागरिकत्वाची जाण असलेली पिढी घडविण्यासाठी त्यांनी गोव्यांतील शाळांची भ्रमंती करून सत्तर हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी संपर्क साधला होता.
केवळ मतदार बनून उपयोगी नाही तर आदर्श नागरिक निर्माण करण्याच्या जिद्धीने त्यांनी कित्येक विद्यालयांमधून नागरिक कल्बांची स्थापना केली होती. ‘गांघीजीली भुरगीं’ ही अभिनव अशी संकल्पना राबविताना त्यानी संपूर्ण गांधीजी कहाण्यांच्या स्वरूपांत निर्माण करून विद्यार्थ्यांमघ्यें राष्ट्रवादी विचारधारा रुजविण्याचे कार्य केले.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘स्वच्छ नारायण पूजे’ सारखी संकल्पना राबविली. ‘मार्ग आमचो इश्ट’ ही पुस्तकें कोंकणी व मराठींत प्रकाशित करून त्याचे वितरण शाळा शाळां मधून घडवून आणले. ‘मार्ग’ची शाखा बेळगांव (कर्नाटक) व सावंतवाडी (महाराष्ट्र) मध्ये स्थापन करून ही चळवळ संपूर्ण भारतांत नेण्याचा त्यांचा मानस होता .
गांथीजी आणि नेहरूंचे विचार सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोचल्यासच देशाची प्रगती होईल असा त्यांचा ठाम विश्वास होता .म्हणूनच त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या पांडुरंग मुळगांवकर वाचनालयांमध्ये त्यांनी वरील दोन्ही नेत्यांच्या संपूर्ण साहित्याचे संकलन केले आहे. गोव्यातील मार्ग सुरळीत व्हावे, अपघात टाळावे यासाठी त्यांनी डॉ. पसरिचा सारख्या तज्ञ व्यक्तीला गोव्यात आणले. मार्ग परिषदाचे आयोजन केले. मार्ग बुलेटिन देखील प्रकाशित केले.
स्व. गुरूनाथ केळेकर हे लेखक होते. त्याचे बाल साहित्य प्रकाशित झालेले आहे. लहान मुलांसाठी ‘मारूती’ हे मासिकही बरेच लोकप्रिय ठरले होते. साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी घटप्रभा येथे घेऊन जायचे व तेथील डॉ. वैद्य यांच्याशी संवाद घडवून आणायचे. गेली कित्येक वर्षे त्यांनी हा उपक्रम राबविला होता. ‘नवे गोंय’ हे साप्ताहिकही त्यांनी प्रकाशित केले. कोकणी प्राथमिक शाळा सुरू करण्यातही त्यांनी योगदान दिले होते.
मुंबईत असताना गिरगांवमध्ये देशलढय़ासाठी होणाऱया मिरवणुका व घोषणा यांचा प्रभाव गुरूनाथ केळेकर यांच्यावर पडला व तेथूनच ते स्वातंत्र्य लढय़ाकडे जोडले गेले.
मान्यवरांच्या प्रतिक्रीया
स्फूर्ती देणारा नेता गमावला
गुरूनाथ केळेकर यांच्या निधनाने मार्ग संस्थेचा केवळ संस्थापक नव्हे तर मार्गदर्शक व सर्व कामांमध्ये स्फूर्ति देणारा नेता गमाविल्याचे मार्गचे अध्यक्ष प्रशांत नाईक यानी म्हटले आहे.
अखेरच्या श्वासापर्यंत तरुण राहिले
गोव्याचे जेष्ट स्वातंत्र्यसैनिक, मार्ग संस्थेचे संस्थापक, प्रखर गांधीवादी व नेहरू विचारांचे प्रणेते, कोंकणी मोगी, विचारवंत, लेखक व आपले मार्गदर्शक गुरूनाथबाब केळेकार यांच्या निधनाने आपल्याला तीव्र दुःख झाल्याची प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केली आहे.
समाजासाठी कार्य करताना गुरूनाथबाब अखेरच्या श्वासापर्यंत तरुण राहिले. गोव्याचा स्वातंत्र्य लढा, मार्ग अभियान, नेहरू सेंटर, कोंकणी चळवळ तसेच गांधीजींचे विचार व नेहरुंच्या तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्यात त्यांचे खुप मोठे योगदान नेहमीच स्मरणात राहील व पुढील पिढीनां प्रेरणा देत राहील. आपण त्यांच्या कुटूंबियांच्या व अनुयायांच्या दुःखात सहभागी आहोत असे श्री. कामत यांनी म्हटले आहे.
खरा गोमंतकीय गमावला
गुरूनाथ केळेकर हे स्वातंत्र्यसैनिक होतेच. त्याच बरोबर ते खऱया अर्थाने गोंयकार होते. ते प्रखर गांधीवादी होते. कोकणी व गोंय बरोबर पुढे जावे अशी त्यांची विचारधारा होती. रस्त्यावर वाहन चालविताना सामाजिक भान ठेऊन वाहन चालविले पाहिजे असे ते नेहमीच म्हणायचे. संपूर्ण गोव्यात ‘देव बरे करू’ असे फलक लावले पाहिजे, जेणेकरून सर्वांवर देवाची कृपा असावी असा एक चांगला विचारवंत गोव्याने गमावला असल्याची प्रतिक्रीया माजी उपमुख्यमंत्री तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे.
वैचारिक गुरू, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी गमावला
ज्ये÷ स्वातंत्र्यसेनानी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ केळेकर यांना श्रीमंत श्रद्धांजली वाहताना गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘आपण वैचारिक गुरू, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी गमावला आहे. गेल्या 25 वर्षांपासून गुरुनाथबाबांशी आपले अतिशय जवळचे नाते होते. आपल्याला सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी म्हणून उभे करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. आपण स्वताला भाग्यवान समजतो की, गुरूनाथबाब केळकराबरोबर अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली. दोघांमध्ये वयाचा मोठा फरक असूनही देखील कधीही कनिष्ठ न मानता, मित्र म्हणून वागणूक दिली. नेहरू सेंटर, कोकणी चळवळीत फ्रान्सिस लुइस गोम्सचे आदर्श प्रचार, शाळांमध्ये नागरी क्लब तयार करणे किंवा कार्यरत असताना लोहिया मैदानाची साफसफाई करणे इत्यादी अनेक विषयांवर एकत्रित काम करण्याची संधी मिळाल्याचे श्री. चोडणकर यांनी म्हटले आहे. ते नेहमीच तरूण मुलांसाठी प्रेरणास्थान म्हणून कायम राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत तरुण पिढीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता.
अनिवासी भारतीय आयुक्त तथा माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर तसेच फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी स्व. गुरूनाथ केळेकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. केळेकर हे स्वातंत्र्यसैनिक होतेच, त्याच बरोबर मार्ग अभियानच्या माध्यमांतून त्यांनी समाजासाठी योगदान दिल्याचे म्हटले आहे.