अरबाज खून प्रकरणाच्या तपासात तंत्रज्ञानाची अमूल्य मदत : पोलिसांनी ट्विटरवरून केला प्रकरणाचा पर्दाफाश, खुनासाठी 5 लाखाची सुपारी
प्रतिनिधी /बेळगाव
एखाद्या खून प्रकरणानंतर तपासाची दिशा निश्चित झाली तर त्या प्रकरणाचे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. तपासाच्या आधी जे चित्र असते ते चित्र तपासानंतर तसेच राहील, याची खात्री नसते. गुन्हेगार पुरावे नष्ट करण्यासाठी धडपडत असतो. आपण या प्रकरणात अडकू नये, याची काळजी घेत असतो. काही वेळा या प्रयत्नात गुन्हेगारांना यशही येते. तर काही वेळा तपास अधिकारी वरचढ ठरतात. अरबाज मुल्ला या 24 वषीय तरुणाच्या खून प्रकरणाचा तपास देखील अशा नेमक्मया दिशेने सुरू होता. एखाद्या प्रकरणाच्या तपासात तांत्रिकतेची मदत किती होते, हे या प्रकरणाच्या तपासावरून दिसून आले.
28 सप्टेंबर रोजी आझमनगर येथून चर्चेसाठी बोलावून त्याचा भीषण खून करण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी खानापूर रेल्वे पुलापासून हाकेच्या अंतरावर त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला. रेल्वेखाली आत्महत्या भासवण्याचा हा प्रयत्न होता. पुरावे नष्ट करण्याच्या घाईगडबडीत त्याच्या हातापायाला बांधलेली गाठ तशीच राहून गेली होती. तेथेच ही आत्महत्या नसून खून आहे, यावर शिक्कामोर्तब झाले होते.
अरबाजची आई नजिमा शेख-मुल्ला या उर्दू शाळेत शिक्षिका आहेत. पहिल्याच दिवशी रेल्वे पोलीस स्थानकात त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. काही संशयितांची नावेही पोलिसांना सांगितली. आपल्या मुलाचा ज्या तरुणीशी प्रेमसंबंध होते, त्या तरुणीचे आई-वडील इराप्पा कुंभार व सुशीला कुंभार या दांपत्याच्या नावाबरोबरच आणखी एक नाव त्यांनी प्रामुख्याने घेतले. ते नाव होते पुंडलिक महाराज.
रेल्वे पोलिसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱया दिवसापासून त्या दांपत्याची चौकशी केली. आणखी काही संशयितांना पोलीस स्थानकात बोलावून त्यांचीही कसून चौकशी करण्यात आली. मात्र, शेवटपर्यंत कोणीच तोंड उघडले नाही. 4 ऑक्टोबर रोजी हे प्रकरण खानापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. बैलहोंगल, खानापूर, नंदगड पोलीस अधिकाऱयांची टिम तयार करण्यात आली. याचवेळी गेल्या रविवारी 3 ऑक्टोबर रोजी अरबाजच्या ट्विटर अकौंटवरून एका ट्विटची नोंद झाली. ‘आय ऍम अलाईव्ह’ असे त्यामध्ये नोंद होते. तेथूनच तपासाला खऱया अर्थाने गती मिळाली.
गेल्या काही वर्षांपूर्वी ‘दृश्यम’ नावाचा चित्रपट अशाच प्रकारच्या खून प्रकरणावर बेतला होता. तो गाजलाही होता. मुलीची अब्रू वाचविण्यासाठी वडिलांनी घेतलेला निर्णय आणि त्याला कुटुंबियांची मिळालेली साथ असे त्याचे कथानक होते. अरबाज मुल्ला खून प्रकरणातही अशाच घडामोडी घडल्या आहेत. 26 सप्टेंबर रोजी आंतरधर्मीय प्रेमप्रकरणाला विरोध करण्यासाठी खानापुरात बैठक झाली. अरबाज, त्याची आई नजिमा यांना बोलाविण्यात आले होते. या तरुणीचा नाद सोड, असा दम भरण्यात आला होता. त्याच दिवशी अरबाजचा काटा काढण्याचेही ठरविण्यात आले होते. चर्चेच्या नावाने त्याला बोलावून या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांना त्याला दाखविण्यात आले होते.
28 सप्टेंबर रोजी अरबाजची आई नजिमा गोव्याला गेल्या होत्या. त्याच दिवशी त्याच्याशी संपर्क साधून घरातून बोलावून घेण्यात आले. कुतबुद्दीन बेपारी (वय 25) व त्याच्या आणखी एका साथीदारामार्फत अरबाजला बोलावून घेण्यात आले. बेळगावहून पिरनवाडीपर्यंत तो बसमधून आला. तेथून त्याला मारुती व्हॅनमधून खानापूरला नेण्यात आले. व्हॅनमधून उतरल्यानंतर लगेच त्याचा भीषण खून करण्यात आला. त्याचे शिर धडावेगळे करून मृतदेह रेल्वेरूळावर टाकण्यात आला.
खुनाची तयारी आधीच करण्यात आली होती. इराप्पा कुंभार हा पिग्मी गोळा करतो. खून झाला त्या दिवशी सकाळी त्याने घातलेले शर्ट वेगळे होते. इराप्पाला गाठून त्याच्या अंगावरील शर्ट रेल्वेरूळाजवळ नेण्यात आले. अरबाजचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणापासून जवळच त्याचा खून झाला. खून करताना इराप्पाचे शर्ट संशयिताच्या अंगावर होते. रक्ताने माखलेले हे शर्ट इराप्पा कुंभारच्या घरी ठेवण्यात आले. रेल्वेखाली आत्महत्या अशी नोंद होऊन प्रकरण मिटले तर सगळेच सुटलो. जर उघडकीस आले तर मुलीची अब्रू वाचविण्यासाठी बापाकडून खून असे चित्र रंगवायचे होते. पोलिसांनी ट्विटरवरून या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
खुनाचा प्लॅन आधीच ठरला…
अरबाज मुल्लाचा खून सुपारी देऊन करण्यात आला आहे, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 5 लाखांची सुपारी ठरली होती. त्या तरुणीच्या आई-वडिलांनी पुंडलिक महाराजला 60 हजार रुपये दिल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याबरोबरच इतर नाजूक कारणेही या प्रकरणाशी निगडीत आहेत. खुनाचा प्लॅन आधीच ठरला होता. त्यामुळे सध्या अटक करण्यात आलेले बहुतेक संशयित दिवसभर सीसीटीव्हीच्या चित्रणाखाली वावरत होते. जेणेकरून खून झाला त्यावेळी आम्ही अमूक ठिकाणी होतो, हे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पोलिसांनी याचाही पर्दाफाश केला आहे. पिरनवाडीतून अरबाजला मारुती व्हॅनमधून नेताना पाच जण होते. कुतबुद्दीन बेपारी हा मोटारसायकलवरून व्हॅनच्या मागे जात होता. यासंबंधीचे पुरावेही तपास अधिकाऱयांच्या हाती लागले आहेत. सुरुवातीला या प्रकरणाला जातीय रंग देऊन देशभर पसरविण्यात आले. ‘जस्टीस फॉर अरबाज’ ही मोहीम सोशल मीडियावर राबविण्यात आली. प्रत्यक्षात प्रकरणाचा उलगडा झाला त्यावेळी या प्रकरणातील जातीय रंग फिका झाला. कारण मारेकऱयात काही अल्पसंख्याकाचाही समावेश आहे.