ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विनामास्क कार्यक्रमाला हजेरी लावली. यावर पत्रकारांनी विचारणा केली असता, ते म्हणाले, मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतोय…, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. दरम्यान, यावेळी या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे उपस्थित होते. त्यांनी मात्र, यावेळी मास्क लावलेला होता.
कोरोनाच वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. याबाबत आपला राग व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडघुस घालू शकतात. मात्र, शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढे जर कोरोनाचे संकट पुन्हा येत आहे, असे दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत. निवडणुका पुढच्या वर्षी घ्या, काहीही फरक पडणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
- मराठी भाषा गौरव दिन आल्यावर सरकारला जाग येते
राज ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सरकारच्या मनात आहे की नाही? याबाबत माहिती नाही. यांना फक्त संभाजीनगरसारखे करायचे आहे. हा दिवस आल्यानंतर सरकारला जाग का येते. त्यांना असे का बोलावसे वाटते. सरकारला तुम्ही या गोष्टी विचारायला हव्यात, असे राज ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले की, स्वाक्षरीची मोहिम पहिल्यांदा होतेय असे नाही. माझी विनंती आहे की, मराठी बांधवांनी स्वाक्षरी मराठीतून करावी. मी सगळीकडे मराठीतच सही करतो. प्रत्येक वेळेला नुसती आसवे गाळत बसण्यात अर्थ नाही. आपण अशा कृतीतून भूमिका घ्यायला हवी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.