मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईला आज सकाळपासुन पावसाने चांगलेच झोडपले आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांचा गोंधळ उडाला आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तसेच रेल्वे स्थानकावर देखील पाणी भरले आहे. पहिल्याच पावसात मुंबई तुंब झाल्याचेचे चित्र सगळीकडे दिसत आहे. मुंबईच्या या सगळ्या परिस्थितीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, पावसाचं पाणी शहरात भरणारच नाही असा दावा कोणीही कधीच केला नव्हता. समुद्राचे दरवाजे बंद, सतत पाऊस सुरु यामुळे पाणी भरणार..पुण्यातही तुंबलं आहे. पण चार तासाच्या वर शहरात पाणी राहत नाही. आत्ताही काही भागांमध्ये पाणी साचलेलं नाही, पाण्याचा निचरा झाला आहे. पूर्वी पावसामुळे चार- पाच दिवस मुंबई ठप्प व्हायची पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही मुंबईतल्या सर्व भागांवर लक्ष ठेवून आहोत. ज्या ठिकाणी निष्काळजीपणा दिसेल तिथे त्वरीत कारवाई करत आहोत.
मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे.