ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यभरात दहीहंडीचा (Dahihandi) उत्सव जल्लोषात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील सर्व सण निर्बंधमुक्त केले आहेत. तर दोन वर्षानंतर राज्यात मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा होत आहे. दरम्यान, मुंबईत सकाळपासून दहीहंडीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १२ गोविंदा (Govinda) जखमी झाले असून त्यापैकी ५ जणांवर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलाय. तर ७ जणांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं.
जखमींपैकी ५ जणांवर नायर रुग्णालय, १ केईएम रुग्णालय, १ ट्रामा हॉस्पीटल, १ डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कांदिवली, १ पोद्दार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशा एकूण १२ जखमींची नोंद झाली असून त्यापैकी ५ जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. ७ रूग्णालयात दाखल असून प्रकृती स्थिर आहे. यात कोणतीही अनुचित घटना नोंदवली नसल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहेत.
दरम्यान मुंबईसह, ठाण्यातही अनेक शिवसेना, भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत पथकांसाठी लाखोंची बक्षीसे ठेवली आहे. त्यामुळे मुंबईतील विविध मंडळांमध्ये दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. गोविंदा पथक पाच ते नऊ थरांपर्यंत मनोरे रचत ठिकठिकाणी हंडी फोडण्याचा मान मिळत आहेत. मात्र यात जखमी होत असल्याच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.