ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं बिगूल लवकरच वाजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, प्रत्येक पक्ष संघटना बांधणीकडे लक्ष केंद्रीत करत आहेत. शिवसेनेनेही पालिकेच्या 150 जागा जिंकण्याची रणनिती ठरवली आहे. त्यामधील 125 जागा आम्ही जिंकू, असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.
परब म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. प्रभाग पुर्नरचनेमुळे आता मुंबई मनपाच्या वॉर्ड्सची संख्या 227 वरुन 236 इतकी झाली आहे. यापैकी 150 जागांवर विजय मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ही निवडणूक आम्ही एकटय़ाने लढण्यास तयार आहोत. पण अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील.
मुंबईकरांना शिवसेनेबद्दल आपलेपणा वाटतो. शिवसेनेमुळे मुंबईतील माता-भगिनी सुरक्षित असल्याचा विश्वास मुंबईकरांना आहे. त्यामुळेच मागील 25 वर्ष जनता आम्हाला निवडून देत आहेत. या निवडणुकीत 150 जागा जिंकण्याची रणनिती आम्ही आखली आहे. त्यापैकी 125 जागा आम्ही जिंकू, असा आम्हाला विश्वास आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.