आग्वाद तुरुंगप्रकरणी गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका : विधानसभेतील उत्तर व विधानात विरोधाभास
प्रतिनिधी /मडगाव
आग्वाद तुरुंगाचे खासगीकरण करण्याचा सरकारचे कोणताच प्रस्ताव नसल्याचे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. मात्र आम्हाला विधानसभेत मिळालेले उत्तर व मुख्यमंत्र्यांचे विधान यात विरोधाभास असून एकामागून एक खोटे बोलून मुख्यमंत्री सावंत प्रमाणित खोटारडे बनले आहेत, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
फातोर्डा येथील पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील टीका केली. विधानसभेत आपण तसेच पक्षाचे अन्य आमदार व आमदार रोहन खवटे यांनी आग्वाद तुरुंगासंदर्भात प्रश्न विचारला होता. प्रश्नकाळ तहकूब झाल्याने तो चर्चेस आला नसला, तरी मिळालेल्या उत्तरात आग्वाद तुरुंग देखरेखीसाठी तसेच चालविण्यासाठी मेसर्स दृष्टी लाईफ सेव्हिंग प्रा. लि. यांना देण्यात आल्याचे नमूद केले आहे. येथील जागेत नृत्यादी कार्यक्रम तसेच मागील भागात बोटिंगसारखे उपक्रम सदर कंपनीला राबविण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
सदर कंपनीला देखरेखीसाठी व चालविण्यासाठी नियुक्त करण्यात आले असेल, तर सरकारने कंपनीला पैसे फेडणे आवश्यक आहे. मात्र सदर कंपनी सरकारला वर्षाला दीड कोटी देणार आहे. यावरून खासगीकरण करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते, असा दावा सरदेसाई यांनी केला. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत 26.69 कोटी रु. खर्चून आग्वाद तुरुंगाचे सुशोभिकरण केले आहे. एवढा खर्च केल्यानंतर वर्षाला दीड कोटी रु. घेऊन सदर तुरुंगाचा वापर करू दिल्यास खर्च केलेला निधी पुन्हा वसूल करण्यासाठी 25 वर्षे लागतील. खरे तर 8 ते 10 वर्षांत सदर रक्कम वसूल होणे हे समिकरण व्यावसायिकदृष्टय़ा योग्य ठरते. मात्र सरकारने ठरविलेले समिकरण जुळत नाही. त्यामुळे या ‘डील’मध्ये बाहेरून कोणी समिकरण जुळवून घेतले असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.
‘जुमला’ करण्यात मुख्यमंत्री पटाईत
आम्ही या खासगीकरणाच्या संदर्भात माहिती हक्क कायद्याच्या अंतर्गत माहिती मागितली असता प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याचे उत्तर मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत खोटे बोलत असल्याचे स्पष्ट होत असून एकामागून एक खोटे बोलण्याबरोबर जुमला करण्यात ते पटाईत झाले आहेत. 10 दिवसांचे विधानसभा अधिवेशन 3 दिवसांपुरते घेऊन त्यांनी लोकशाहीची हत्या केली. भूमिपुत्र विधेयक आणून त्यांनी गोव्याची अस्मिता तसेच संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. गोवा विकण्यासाठी ते एकामागून एक जुमला करत चालले आहे. त्यांना हाताळणाऱयांनी एक यादी दिलेली असून एकामागून एक गोवाविरोधी कामे ते करून घेत आहेत आणि एखाद्या सेल्समेनप्रमाणे ती कामे करण्यासाठी मुख्यमंत्री झटत आहेत, अशी टीका याप्रसंगी आमदार सरदेसाई यांनी केली.