- मनसेने केले खास ‘ट्विट’
ऑनलाईन टीम / मुंबई :
येत्या 15 ऑगस्टपासून ज्या नागरिकांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत, त्यांना लोकल प्रवास करण्यास मुभा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकताच जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनसेनेही खास ट्वीट करत मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. त्यात मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी तातडीने सुरू करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कालच्या भाषणात लोकलबाबत निर्णय जाहीर केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक ट्वीट केले आहे. ‘मुंबईकरांचे हाल थांबवण्यासाठी तसंच मुंबईचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी ज्यांनी लसीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी अत्यंत आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येईल ही घोषणा केली. जनभावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे,’ असे खास ट्वीट केले आहे.