भाजपकडून विरोधात तर सेनेकडून समर्थनार्थ;इतर पक्ष चिडीचूप
सातारा/ प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकरता सातारा जिल्ह्यातील भाजप – सेना थेट राज्यपालांना मेलचा भडिमार करू लागली आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात तर सेनेकडून त्यांच्या समर्थनार्थ हा मेलचा भडिमार सुरू आहे. तर इतर पक्ष मात्र चिडीचूप आहेत. भाजपकडून राज्यपालनियुक्त विधान परिषद आमदार मंत्रिमंडळ प्रस्ताव फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. तर सेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून तात्काळ नियुक्ती करावी किंवा कोरोनामुळे लॉक डाऊन झालेल्या 40 दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
सातारा जिल्ह्यात भाजप आणि सेना या दोन्ही पक्षापेक्षा राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. काँग्रेसने पुन्हा उचल घेतली आहे. सेनेची जिल्ह्यातील अवस्था तीन तिघाड आणि काम बिघाड अशी असून पाटण तालुक्यात मात्र भक्कम आहे ती राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे. जिल्ह्यातील सेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, यशवंतराव घाडगे, जयवंतराव शेलार या तिघांचे ही सध्या काय सुरू आहे ते कुठे चर्चेत ही नसतात. मात्र, तळागाळातील शिवसेनेचे कार्यकर्ते धडपडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुदत मिळावी म्हणून तळागाळातील शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी थेट राज्यपालांना पत्रव्यवहार सुरू केला आहे. त्यामध्ये त्यांनी उध्दव ठाकरे यांना मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या सूचनेनुसार पक्षातील नवेजुने सर्वच कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राज्यपालनियुक्त विधान परिषद आमदार मंत्रिमंडळ प्रस्ताव फेटाळण्यात यावा अशा मागणीचे पत्र मेलद्वारे पाठवले आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने अजून ही तशी कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे दिसत आहे.