पंचमसाली कार्यकारिणीत महत्त्वाचे तीन ठराव
प्रतिनिधी /बेळगाव
मंत्री मुरगेश निराणी यांनी कुडलसंगम येथील पंचमसाली मठाला दिलेली देणगी परत करण्याचा निर्णय बुधवारी गांधी भवन येथे झालेल्या समाजाच्या राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला. यासह तीन महत्त्वाचे ठराव केल्याची माहिती पंचमसाली पीठाचे जगद्गुरू जयमृत्युंजय स्वामीजींनी दिली.
पत्रकारांशी बोलताना स्वामीजी म्हणाले, मुरगेश निराणी यांनी पंचमसाली गुरुपीठाला देणग्या दिल्याचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे आपल्या मनाला दुःख झाले आहे. मठाला त्यांनी काय दिले आहे ते जाहीर करावे. लोकवर्गणीतून ते परत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भक्तांच्या ऋणामध्ये राहणे पसंत असून व्यक्तीच्या ऋणामध्ये राहणे आपल्याला आवडत नाही, असे सांगत मंत्री मुरगेश निराणी यांच्यावर स्वामीजींनी निशाणा साधला. मठाला दिलेल्या देणगीविषयी समाज माध्यमावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे भक्तांनाही दुःख झाले आहे. म्हणून देणगी परत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्वामीजींनी सांगितले.
मठासाठी अनेक भाविकांनी देणगी दिली आहे. मुरगेश निराणी यांनी दिलेल्या देणगीविषयी समाज माध्यमावर चर्चा सुरू असूनही मंत्रिमहोदय मौन बाळगून आहेत. यावरून मंत्रिमहोदयच ही माहिती पसरवत आहेत, असे दिसून येते. झोळी घेऊन भाविकांकडून भिक्षा मागून त्यांनी दिलेली देणगी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या जमखंडी तालुक्मयात पंचमसाली समाजाचे तिसरे गुरूपीठ स्थापन करण्यात येत आहे. त्याला तुमचा विरोध का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर शाखा स्थापन करण्यासंबंधी भाविकांनी इच्छा व्यक्त केल्यास निर्णय घेतला जाणार आहे. तिसऱया गुरूपीठाला आपला विरोध नाही. पाठिंबाही नाही, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा
अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी समाजाला 2-ए आरक्षण जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा नहून अंतिम आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ, माजी आमदार व समाजाचे अध्यक्ष विजयानंद काशप्पण्णावर, आमदार अरविंद बेल्लद, वीणा काशप्पण्णावर, ए. बी. पाटील आदी उपस्थित होते.