प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनामुळे गेली दोन वर्षे महाविद्यालयातील तासिका तत्वावरील (सीएचबी) प्राध्यापक भरती बंद होती. पण यंदा विद्यापीठाने या भरतीला परवानगी दिल्यानंतर अनेक महाविद्यालयांनी सीएचबीच्या प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीसाठी जाहिराती दिल्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण असताना आता नवीन पेचप्रसंग निर्माण झाला आहे. शहरासह जिल्हÎातील अनेक महाविद्यायांचे सीएचबीच्या भरतीचे इंटरव्हÎू येत्या बुधवार 20 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. त्यामुळे एकापेक्षा जास्त महाविद्यालयात अर्ज केलेल्या उमेदवारांपुढे इंटरव्हÎू द्यायचा कुठे, कधी आणि केंव्हा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या पेचप्रसंगातून शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने मार्ग काढावा, अशी मागणी अर्जदार उमेदवारांकडून होत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या पावणेदोन वर्षापासून महाविद्यालये बंद असल्याने तासिका तत्वावरील प्राध्यापकांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण आर्हता, पात्रता असणाऱया प्राध्यापकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने तासिका तत्वावरील प्राध्यापक भरतीसंदर्भातील जाहिरात प्रसिध्द करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरातील शहाजी महाविद्यालय, नाईट महाविद्यालय, कमला महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालयांसह वारणा महाविद्यालय व अन्य महाविद्यालयांनी भरतीसाठी जाहिराती प्रसिध्द केल्या. त्यामुळे पात्र उमेदवारात समाधानाचे वातावरण पसरले. परंतू या सर्व महाविद्यालयांच्या मुलाखती एकाच दिवशी 20 ऑक्टोबर रोजी होणार असल्याने अर्जदार उमेदवारांपुढे नेमके कोणत्या महाविद्यालयात मुलाखत द्यायची आणि दिली तर कधी, केव्हा द्यायची? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. मुलाखती वेगवेगळÎा दिवशी झाल्या तर अर्ज केलेल्या विविध महाविद्यालयात मुलाखती देण्याची संधी पात्र उमेदवारांना मिळाली असती. त्यामुळे तारखेच्या या गोंधळात शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने लक्ष घालून बदल करावेत, अशी मागणी होत आहे.
संभ्रम, गोंधळ अन् संधीत घट
नवीन शासन नियमानुसार एकाच महाविद्यालयावर तासिका तत्वावर अध्यापन करण्यास परवानगी आहे. मात्र पात्र उमेदवारांना अनेक महाविद्यालयात नोकरीसाठी अर्ज करता येतो, मुलाखतीसाठी जाता येते. पण यंदा एकाच दिवशी मुलाखती होणार असल्याने पात्र उमेदवारांत संभ्रम, गोंधळाचे वातावरण आहे. मुलाखतीचे एका पेक्षा जास्त पर्याय असल्याने नियुक्तीची संधी होती. पण आता एकाच ठिकाणी मुलाखत दिल्यास इतर ठिकाणी जाता येणार नाही. त्यामुळे संधी कमी होणार असल्याचे काही पात्र उमेदवारांनी सांगितले.