ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाबच्या फिरोजपूरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा त्रुटींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालेल. चौकशी समितीत चंदीगडचे डीजीपी, एनआयएआयजी, पंजाबचे रजिस्ट्रार जनरल आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल, एडीजीपी पंजाब यांचा समावेश आहे.
न्यायालयाने पंजाब आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांना त्यांचा तपास थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला पंतप्रधानांच्या सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे तातडीने चौकशी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. किंबहुना न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन.व्ही.रामन्ना यांच्या खंडपीठाने पंतप्रधानांच्या पंजाब दौऱयाच्या नोंदी जतन करण्याचे आदेश दिले होते.