मुंबई /प्रतिनिधी
लॉकडाऊनमधील कालावधीत राज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्याबाबत दिनांक ९ मेच्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
सदर आदेशानुसार देण्यात येणारी मोफत बस प्रवासाची सुविधा केवळ खाली नमूद केलेल्या दोन परिस्थितीतच लागू राहील, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले असतील त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर व इतर व्यक्ती जे इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेले आहेत त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्हापर्यंत पोहचविण्याकरिता. याशिवाय कोणत्याही इतर प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल्लाची बससेवा मोफत उपलब्ध असणार नाही, असे शासकीय प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.