मंत्री उमेश कत्ती यांच्याकडून प्रसिद्धीपत्रक जारी
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात लॉकडाऊन कालावधीत बीपीएल रेशनकार्डधारकांना माणसी 5 किलो मोफत तांदूळ देण्यात येत असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते. आता यामध्ये बदल करून तांदळाचे प्रमाण 5 किलोवरून 10 किलोपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे बीपीएल रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेनुसार मे आणि जून महिन्यासाठी बीपीएल कार्डधारकांना प्रत्येक व्यक्तीमागे 10 किलो तांदूळ आणि कार्डामागे 2 किलो गहू आणि अंत्योदय कार्डधारकांना 40 किलो तांदूळ वितरीत करण्यात येत आहे.
राज्यात बीपीएल रेशनकार्डासाठी अर्ज केलेल्या आणि हे अर्ज खात्याच्या पडताळणीच्या टप्प्यात असतील तर त्यांना मे आणि जून महिन्यात प्रत्येकी 10 किलो आणि एपीएल कार्डासाठी अर्ज केलेल्यांना सवलतीच्या दराने प्रतिकिलो 15 रुपयेप्रमाणे 10 किलो तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे, असे मंत्री उमेश कत्ती यांनी पत्रकात उल्लेख केला आहे.