प्रतिनिधी /कुंकळ्ळी
राज्यातील मासेमारीवरील बंदी संपुष्टात येऊन नवीन मोसमाला प्रारंभ झालेला असला, तरी रविवारी पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे बहुतांश ट्रॉलर्सना समुद्रात उतरणे शक्मय झाले नाही. दक्षिण गोव्यातील प्रमुख असलेल्या कुटबण जेटीवरील केवळ सहा ट्रॉलर्स सायंकाळच्या वेळी समुद्रात रवाना झाले असल्याची माहिती कुटबण बोटमालक संघटनेचे अध्यक्ष विनय तारी यांनी दिली
कुटबण जेटीवरील ट्रॉलर्सना साळ नदीच्या मुखाशी रेतीची समस्या भेडसावत असून त्याशिवाय खवळलेला समुद्र अद्याप शांत झालेला नाही. त्यामुळे रविवारी फारशा ट्रॉलर्सना मासेमारीसाठी जाता येणार नाही अशी चिन्हे आधीपासूनच दिसू लागली होती. त्याप्रमाणे बहुतांश ट्रॉलर्सना रविवारी जेटीवर राहावे लागले. केवळ सहा तेही मोठे ट्रॉलर्स रवाना झालेले असून ते परत येतील त्यावेळी मासेमारी कशी झालेली आहे त्याचे चित्र स्पष्ट होईल. कुटबण जेटीवर सध्या मोसमाची तयारी जोरात सुरू असून बरेचसे कामगार अजून परतायचे आहेत.
दरम्यान, कुटबण जेटीवरील पेट्रोल पंपासंदर्भात जसे निर्बंध घातलेले आहेत तसे निर्बंध इतर जेटींवर दिसत नाहीत असा दावा करून अध्यक्ष तारी यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. हे निर्बंध शिथील करण्यासाठी केलेले प्रयत्न सफल ठरू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. बाणावली, कोलवा येथूनही ट्रॉलर मासेमारीसाठी रवाना झालेले आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.