महामुनी शुकदेव वर्णन करतात-जितका पावसाचा वर्षाव होतो तितके सारे पाणी सागर आत्मत्वाने, स्वतःचे म्हणून स्वीकारतो. कारण मुळात समुद्राच्या पाण्याचीच वाफ होऊन त्यापासूनच मेघ निर्माण होतात. त्याच मेघातील पाण्याचा पाऊस म्हणून वर्षाव होत असतो. घट, मठ, पर्वत हे पृथ्वीवर पडले तर त्यांचे पृथ्वीला ओझे होते काय? कारण मातीपासून निर्माण होते ते मातीत मिसळते. अग्नीपासून निर्माण होते ते अग्नीत मिसळते. त्याप्रमाणे श्रीधर हा जगताचा आधार आहे. जगतातील सर्व शक्तीचा मूळ स्रोत, समग्र शक्ती चेतवणारा परमात्मा श्रीकृष्णच आहे. जांबवंताचे जितके बळ आहे ते कृष्णाच्या अंगचेच नव्हे काय? जांबवंताच्या सर्व शक्तीचा स्रोत श्रीकृष्णच आहे. त्यामुळे जांबवंताच्या शक्ती प्रहाराने कृष्ण विकळ होईल हे बोलणे वायफळ आहे. घटामध्ये आकाश असते ते घटाकाश मूळ आकाशापासून वेगळे करता येत नाही आणि आकाशही ब्रह्मांडापासून वेगळे करता येत नाही. त्याप्रमाणे जांबवंताची शक्ती ही परमेश्वरी शक्तीचाच भाग असल्याने परमेश्वराला कोणताही त्रास देऊ शकत नाही. श्रीकृष्णाच्या मुष्टीप्रहाराने जांबवंताचे शरीर मात्र विकळ झाले. त्याला आश्चर्य वाटले आणि तो मनोमन विचार करू लागला.
मजसारिखा वीर वरि÷ । उचलूं शके ब्रह्माण्डघट ।
मुष्टिप्रहारें मेरु पीठ । करीन घोंट सिंधूचा ।
कीं शेष काढूनि पाताळीं। सोडूनि देईन गगनबिळीं।
भूगोल सांवरीन करतळीं । अतुलबळी मज ऐसा ।
ऐसा गर्व माझ्या आंगीं । त्या मज भंगिलें समररंगीं।
मजहूनि बळि÷ या भूभागीं । कोण हा जगीं मज मीनला ।
मजहूनि याचें प्रचंड बळ । सामान्य नर नोहे केवळ।
विस्मित होत्साता प्राञ्जळ । त्रैलोक्मयपाळ हाचि गमे ।
एवं विवरूनि अंतःकरणीं । म्हणे हा प्रत्यक्ष कोदंडपाणि । बोलता झाला नम्रवाणी। बद्धपाणि नतमूर्धा । पूर्ण परिचय भगवंतातें। दावूनि म्हणे तुज म्यां निरुतें। जाणितलें त्या संकेतातें । श्रीअनंतें परिसावें । जांबवंत मनोमन विचार करू लागला-मी सामान्य बलवान वीर नव्हे. मी ब्रह्मांडाला उचलू शकेन. माझ्या मुष्टीप्रहाराने मेरू पर्वताचे पीठ करू शकेन. एका घोटात समुद्र पिऊन टाकीन. शेषाच्या शेपटीला धरून त्याला पाताळातून बाहेर खेचून काढून आकाशाच्या बिळात भिरकटवून टाकीन. माझ्या हाताच्या तळव्यावर अख्खी पृथ्वी सावरेन. असा मी अतुल बळी आहे. असा गर्व मला आजवर झाला होता. पण मला समरांगणात भिडून विकल करणारा माझ्यापेक्षा बलवान असा हा कोण आहे? माझ्याहून याचे बळ प्रचंड आहे. हा सामान्य मनुष्य नव्हे. विस्मयित होऊन विचार करतो तो वाटते की हा त्रैलोक्मयाचा पालक भगवानच असावा. हा माझा स्वामी कोदंडपाणि भगवान श्रीरामच असावा. असा विचार करून तो नतमस्तक होऊन हात जोडून उभा राहिला व म्हणाला-हे प्रभो! मी तुला ओळखले.
तूतें जाणितलें म्यां स्वामी । सर्वभूतांचा अंतर्यामी ।
प्राणओजसहोबळनामीं । भूतग्रामीं वर्तसी तूं ।
Ad. देवदत्त परुळेकर