निकृष्ट बांधकाम पाडून नवीन करण्याचे आदेश.
म्हासुर्ली / वार्ताहर
म्हासुर्ली (ता.राधानगरी) येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे बांधकाम निकृष्ट होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी करत काम बंद पाडले होते.यांची दखल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेत शुक्रवारी आरोग्य केंद्रस्थळी भेट देऊन पाहणी केली.यावेळी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार करत जाब विचारला. त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर बनले होते. शेवटी अधिकाऱ्यांनी झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे मान्य करत निकृष्ट बांधकाम पाडून नव्याने करण्याचे आदेश ठेकेदारास दिल्यानंतर आक्रमक ग्रामस्थ शांत झाले.
दुर्गम व आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या धामणी खोऱ्यातील सुमारे ५०ते ६० वाड्यावस्त्यांच्या मागणीनुसार आ. प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून म्हासुर्ली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून गतवर्षी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
सुमारे चार कोटी रुपये अंदाजित रकमेचे हे प्राथमिक केंद्र असून त्याचे बांधकाम मुख्य ठेकेदार कंपनी अंतर्गत पोट ठेकेदाराकडून सुरू आहे. सध्या प्राथमिक केंद्र इमारतीच्या पायाचे काम सुरु आहे. सदर कामाच्या भरावसाठी ठेकेदाराकडून मुरमा ऐवजी माती वापर केला आहे.तसेच खराब गठ्ठे झालेले सिमेंट,अत्यल्प सिमेंट, तसेच अन्य वस्तूंचे प्रमाण जास्त असून सर्व काम पूर्णतः अत्यंत निकृष्ट पद्धतीने सुरु होते. तर विटा ही निकृष्ट वापरण्यात येत होत्या. तसेच शासनाचे यम धाब्यावर बसवत रात्रीच्या वेळी काम सुरु ठेवून मनमानी चालवली होती.
याची दखल जागृत ग्रामस्थांचा घेत सदर बांधकामाबाबत संशय व्यक्त केला होता. तर ग्रामस्थांनी सकाळी जाऊन पाहिले असता रात्रीच्या वेळी करण्यात आलेले काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थानीं आरोग्य केंद्राचे काम बंद गेलेल्या दोन दिवसापासून बंद पाडले होते.
सदर कामाच्या दर्जाबद्दल विभागाचे आमदार आबिटकर यांच्याकडे तक्रार ग्रामस्थांनी करत याबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र बांधकाम विभागाने गुरुवारी चौकशी करीता कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी कामावर पाठवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला असल्याने ग्रामस्थांत संताप अनावर झाला होता. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक या कामाकडे न फिरकल्याने ग्रामस्थचा तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यामुळे संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष बांधकामास भेट देऊन चौकशी करत नाहीत तोपर्यत काम बंद ठेवण्याचे ग्रामस्थांनी ठेकेदारास सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार शुक्रवारी पंचाय समितीच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियतां श्री. खैरे , उपभियता श्री विनायक खोत , किशोर परिट यांनी सदर इमारत बांधकाम ठिकाणी भेट देत पाहणी केली असता ठेकेदाराने निकृष्ट बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले. यावेळी ग्रामस्थांनी अधिकारी, ठेकेदार यांना जाब विचारत धारेवर धरले. त्यामुळे काही काळ वातावरण गंभीर बनले होते. शेवटी निकृष्ट बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी ठेकेदारास देत कामात सुधारणा करण्यास सांगितले आहे.यावेळी सदाशिव कांबळे, सागर पांडव, संभाजी कांबळे, नितीन कांबळे, अजित कांबळे, तुकाराम कांबळे, महेश आठल्ये, युवराज भित्तम,विशाल कात्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.