युवराज भित्तम / म्हासुर्ली
कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळाचा गैर फायदा घेत वनतस्करानीं म्हासुर्ली – धामोड (ता राधानगरी) या मुख्य मार्गावरील बाजारीवाडा फाट्यानजीक असणाऱ्या वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या सरकारी मुलकीपड जमिनी मधील वृक्षांची रात्रीच्या वेळी तस्करांच्याकडून कटरच्या साह्याने तोड करुन मोठ्या प्रमाणात टेम्पोतुन वाहतूक करुनही या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागानीं दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींतून होत आहे.
शेकडो झाडांची राजरोस कत्तल सुरु असताना या गंभीर प्रकाराकडे सामाजिक वनीकरण विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. तर वन विभागाने केवळ पंचनामा करून कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.या प्रकरणाच्या मुळाशी संबंधित विभाग प्रामाणिक पणे गेल्यास तालुक्यातील वनतस्करीचे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
म्हासुर्ली पैकी बाजारीवाडा फाट्यानजीक केळोशी बुद्रुक हद्दीमध्ये वन विभागाने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. तर येथे शेजारीच गट क्रमांक ३४२ या सरकारी मुलकी पड जमिनीमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने ही सुमारे वीस वर्षापूर्वी वृक्ष लागवड केली आहे. यामध्ये विविध जातीचे मोठ मोठे वृक्ष असून तस्करांनी फर्निचर कामासाठी उपयुक्त असणाऱ्या ऑस्ट्रेलियन बाभळ जातीच्या शेकडो वृक्षांची कटरच्या साह्याने तोड करून रात्रीच्या वेळी वाहनातून लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या खामकरवाडी ग्रामपंचायत मालकीच्या क्षेत्रातील सामाजिक वनीकरण विभागाने लागवड केलेल्या गर्द वनराईची अशाच प्रकारे काही वर्षापूर्वी अवघ्या काही दिवसात तस्करांकडून लुट केली होती.
म्हासुर्ली – धामोड या मुख्य मार्गावर रात्रीच्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र कोरोना पार्श्वभूमीमुळे सध्या सदर मार्गावरील वाहतूक रात्रीच्यावेळी पूर्णपणे बंद असते.याच संधीचा फायदा वनतस्करांनी घेतला असून परिसरासह तालुक्यातील काही फर्निचर व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या काही जणांना हाताशी धरून अशाप्रकारे लाकडाची तस्करी केली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.