ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दहिहंडी उत्सव यंदा होणार नाही व तो साजरा केला जाऊ नये असे आवाहन दहिहंडी समन्वय समितीने सर्व मंडाळांना केले आहे.
या निर्णयानुसार, ‘सर सलामत, तो पगडी पचासचा’ नारा देत दहिहंडी उत्सव साजरा करणार नसल्याचं समितीनं जाहिर केलं. 2020 हे वर्ष वैश्विक अर्थारोग्य, मानसिकारोग्य आणि शारीरीकारोग्य यादृष्टीने जरा अवघडच जात आहे. यंदाच्या कोरोना संकटाने, महामारीने मात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.
त्यामुळे यंदा श्रीकृष्णजन्माष्टमी सण हा अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करायचा निर्णय घेतला आहे. विभागीय पोलीस अधिकारी त्याबद्दल सूचना करतीलच परंतु आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा त्याविषयीचा ताण थोडा कमी होईल, असं देखील समितीने म्हटलं आहे.
मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुसऱ्या दिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये असे समितीचे मत तर आहेच पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहिहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे, असं दहिहंडी समन्वय समितीने म्हटलं आहे.