प्रतिनिधी / पुणे
यावर्षीच्या पहिल्या ‘असनी’ या चक्रीवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरात होत असून, हे वादळ 22 मार्चपर्यंत बांगलादेश ते म्यानमार किनारपट्टीला धडकेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. शनिवारी अकोला येथे सर्वात जास्त 42.7 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर तसेच लगतच्या भागात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राचे येत्या सोमवारपर्यंत वादळात रुपांतर होईल. यानंतर हे वादळ उत्तर-उत्तरपूर्वेच्या दिशेने प्रवास करीत बांगलादेश तसेच म्यानमारच्या दिशेने कूच करेल. 22 मार्चपर्यंत हे वादळ या दोन्ही किनारपट्टीलगत असेल. याच्या प्रभावामुळे अंदमान समुद तसेच अंदमान-निकोबार बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच या भागात तीव्र वारे वाहणार आहेत. यामुळे या भागात मच्छिमारांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
या चक्रीवादळाला ‘असनी’ हे नाव श्रीलंकेने दिले आहे. या वर्षीचे हे पहिलेच चक्रीवादळ आहे. हे वादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाणार आहे.