प्रतिनिधी/ कारवार
कार आणि लॉरी दरम्यान झालेल्या भीषण अपघातात चार क्यक्ती जागीच ठार झाल्याची दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरवती येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 (हुबळी -अंकोला) वर घडली. मृतामध्ये दोन पुरुषांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. कारमधील सर्व चारही व्यक्तींचा मृत्यू झाल्याने मयतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
अपघाताबद्दल समजलेली अधिक महिती अशी, दिल्ली पासिंगची कार हुबळीहून अंकोलाकडे निघाली होती. तर अंकोलाहून हुबळीकडे निघालेल्या महाराष्ट्र पासिंगची लॉरी आणि कार दरम्यान अपघात झाला आणि कारमधील चारही व्यक्ती ठार झाल्या. अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने चारही मृतदेह कारमध्येच अडकून पडले होते. यल्लापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपघातास्थळी दाखल झाले असून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीचे हे प्रवासी दक्षिण भारत प्रवासाला निघाले होते असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताचा तपशील अद्याप हाती आलेला नाही. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.