मुख्यमंत्री बदलणार नाही – अरुणसिंग यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुख्यमंत्री बदलाच्या मुद्दय़ावरून राज्य भाजपमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी भाजप राज्य प्रभारी अरुणसिंग बुधवारी बेंगळुरात दाखल झाले आहेत. मंत्री आणि आमदारांची भेट घेऊन नंतर त्यांनी ‘राज्यात कोणत्याही कारणास्तव मुख्यमंत्री बदलणार नाही. येडियुराप्पा यांच्याविषयी हायकमांडला विश्वास आहे. त्यामुळे पुढील काळातही तेच मुख्यमंत्रिपदी असतील’, असे स्पष्टीकरण अरुणसिंग यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिले.
हायकमांडच्या सूचनेवरून बेंगळुरात दाखल झालेले अरुणसिंग शुक्रवारी रात्रीपर्यंत बेंगळुरातच ठाण मांडून पक्षातील आमदार आणि नेत्यांशी चर्चा करून पक्षातील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. गुरुवारी ते दिवसभर आमदारांशी चर्चा करतील. तर शुक्रवारी भाजपच्या राज्य कोअर कमिटीची बैठक होणार आहे. बुधवारी सायंकाळी त्यांनी विविध मंत्र्यांशी चर्चा केली. तत्पूर्वी, बेंगळूरच्या ‘कुमारकृपा’ अतिथीगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपल्याला सर्व आमदार, खासदार एकच. नेतृत्वबदलाविषयी त्यांनी वाच्यता करणे साहजिकच आहे. मात्र, हायकमांडने प्रत्येक वेळी स्पष्टीकरणही दिले आहे. पुढील दोन वर्षे येडियुराप्पाच मुख्यमंत्रिपदावर असतील. मंत्री आणि आमदारांमध्ये मतभेद नाहीत. कोणत्याही आमदाराला तक्रार करायची असेल तर त्यांनी वैयक्तिकपणे आपल्याशी चर्चा करावी. प्रसारमाध्यमांपुढे वाच्यता करू नये, अशी ताकिदही अरुणसिंग यांनी दिली आहे.
कोरोना नियंत्रण कामांविषयी प्रशंसा
कोरोना संकटकाळात येडियुराप्पा यांच्यासह सर्वच मंत्र्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बीपीएल रेशनकार्डधारक कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत देण्याची योजना देशात प्रथमच कर्नाटकामध्ये घोषित करण्यात आली आहे, अशी प्रशंसाही अरुणकुमार यांनी केली.
आपला हा राजकीय दौरा नाही. राज्यातील कोरोना नियंत्रण कामासंबंधीचा आढावा आणि चर्चा करण्यासाठी आपण येथे आलो आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोरोना नियंत्रणाचे काम चांगल्या पद्धतीने केले आहे. संकटग्रस्तांसाठी दोन विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. येडियुराप्पा यांच्या उत्तम प्रशासकीय कामकाजाचा हा पुरावा आहे, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
काँग्रेस आरोप करण्यात दंग, निजद क्वारंटाईनमध्ये
तत्पूर्वी नवी दिल्लीहून बेंगळूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, कोरोनाकाळात भाजपने उत्तम कार्य केले आहे. तरीसुद्धा काँग्रेस नेते आरोप करण्यात दंग झाले आहेत. तर निजद नेते क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी कोपरखळी अरुणसिंग यांनी मारली.
मंत्र्यांच्या बैठकीत मंत्री योगेश्वर विलंबाने दाखल
अरुणसिंग यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता प्रदेश भाजप कार्यालयात मंत्र्यांची बैठक बोलावली होती. नेतृत्वबदलाची मागणी करणाऱयांमध्ये आघाडीवर असलेले मंत्री सी. पी. योगेश्वर मात्र या बैठकीला विलंबाने आले. योगेश्वर यांच्या प्रतिक्षेत 5.30 वाजता या बैठकीला सुरुवात करण्यात आली. सुमारे एक तास विलंबाने म्हणजेच 6.30 वाजता योगेश्वर बैठकीला हजर झाले. बैठकीत उघडपणे विरोध व्यक्त करणे शक्य नसल्याने विलंबाने येऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते. बैठकीवेळी अरुणसिंग यांनी प्रत्येक मंत्र्यांची मते जाणून घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षाच्या वर्चस्वाला धक्का पोहोचतील अशी विधाने न करण्याची सूचना मंत्र्यांना दिल्याचे सांगितले.
सोमवारी मंत्रिमंडळ बैठक
भाजपचे राज्य प्रभारी अरुणसिंग बेंगळुरात दाखल झाले असून 18 जून रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री बदलासह विविध मुद्दय़ांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, 21 जून रोजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. सोमवारी 21 रोजी सायंकाळी 4 वाजता विधानसौधमध्ये येडियुराप्पांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ बैठक होणार आहे.