योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांचा सल्ला
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मी जरी योगी असलो तरी सर्व प्रलोभनांपासून अलिप्त आहे. यावेळी बाबांनी काही संस्कृत श्लोकांद्वारे योगी शब्दाची व्याख्या पटवून सांगितली. ज्याचा सत्य हाच मित्र आहे, दया हिच बहीण आहे. संयम नावाचा भाऊ आहे. मनःशांती ही ज्याची पत्नी आहे, ज्याला दिशा याच वस्त्र आहेत आणि आकाश हेच छत आहे. त्याला योगी म्हणावं. तसेच योगी माणसाची श्रेष्ठता सकाम करणाऱया माणसाहून श्रेष्ठ आहे. म्हणून योगी बना, पण लोभी बनू नका, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर साधून पतंजली योग समिती व महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह येथे महिला महासंमेलन पार पडले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर योगगुरू स्वामी रामदेव बाबा, साध्वी देवप्रिया, पू. परमार्थ देव, पू. आनंद देव तसेच जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, नगरसेविका शिल्पा सुर्वे, शितूत, उर्मिला घोसाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मुलांवर संस्कारासाठी प्रत्येक महिलेकडून योगसाधना गरजेची
महिलांच्या जीवनात अनेक मानसिक, शारिरीक समस्या येत असतात. मात्र यावर केवळ एकच उपाय आहे तो म्हणजे योग. कुटुंबातील प्रत्येक महिलेने योग केल्यास त्याचे चांगले संस्कार तुमच्या मुलांवर होणार आहेत. त्यामुळे सर्व महिलांनी योगसाधना करणे गरजेचे आहे. कोरोना काळातही आपल्याला योगाचे महत्व कळलेले आहेच. त्यामुळे आपण योगाद्वारे भारताला विश्वविजयी करुया, असा निर्धार योगगुरू रामदेव बाबां यांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित महिलावर्गाला संबोधित करताना स्वामी रामदेव बाबांनी महिलांच्या आरोग्यासोबतच योग व योगी याची परिभाषा स्पष्ट करुन सांगितली. योगाला समर्पित झाल्यावर काय होत, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मी स्वतः असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व रोगांचा नाश करण्याची ताकद ही योगात आहे. योगामुळे केवळ शारिरीक तंदुरुस्ती नाही तर मनशांतीही मिळते. योग माणसाच्या जीवनाच मूळ असून प्रत्येकाने योग केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी उपस्थितांसमोर दिला.
वेळीच योगाचे महत्व जाणा!
राष्ट्राच्या जडणघडणीत महिलांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक आईने स्वतःच्या मुलांना आरोग्याच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी योगाचे महत्व जाणले पाहिजे. कोरोनाच्या आधी जर बहुतांश जण योग करत असते तर कोरोनाचा मृत्यूदर घटला असता पण अजूनही वेळ गेलेली नाही. वेळीच योगाचे महत्व जाणा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पू. साध्वी देवप्रिया यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. कोरोना विषाणूचा तुमच्या संततीवर एकप्रकारे प्रहार झालेला आहे. त्यामुळे येणाऱया काळात असे अनेक प्रकारच्या विषाणूंपासून संततीला सुरक्षित ठेवण्यासाठी योगाद्वारे परिपूर्ण व्हा. योग करून तुम्ही तुमच्या आत्म्याची उन्नती करा. ज्यातून राष्ट्राची उन्नती साधली जाणार असल्याचे सांगितले.