मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रंगकर्मींनी आंदोलने करत ज्या मागण्या केल्या आहेत त्यातील काही रास्त मागण्या आपत्ती व्यवस्थापनाकडे पाठवणार आहोत. टास्क फोर्ससोबतही चर्चा होईल आणि त्यानंतर आंदोलनकर्त्या रंगकर्मींच्या प्रश्नांसंदर्भात अंतिम निर्णय होईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
अमित देशमुख म्हणाले की, चित्रपटगृहे, नाट्यगृहे,सभागृहे मनोरंजनाची संपूर्ण व्यवस्था लवकरात लवकर सुरू होणे ही राज्य सरकारची देखील इच्छा आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने त्यात काही निर्बंध लागू करण्याची वेळ आली तर पुन्हा आपल्यासमोर नवे आव्हान उभे राहिल. त्यामुळे राज्य सरकार जी आर्थिक योजना घेऊन येत आहे त्याची व्याप्ती राज्यभर असेल. तिसरी लाट येणार नाही आणि आली तरी त्याची तीव्रता कमी असेल अशी आशा आहे. यासाठी आम्ही कार्यरत आहोत. सृष्टीला वाचवण्यासाठी जी गरज आहे तशीच पाऊले आम्ही उचलत आहोत. परंतु कोरोना कसा वागेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रासाठी योग्य निर्णय योग्य वेळीच घ्यावे लागतील. कोरोनाच्या नियमांद्वारे जी शिथिलता देता येईल त्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
कलावंताच्या समस्यांसाठी अनेकांशी आमची चर्चा झाली. अनेक संघटनांनी शासनाशी संपर्क साधला. सर्व घटकांशी चर्चा करुन त्यांचा विचार करुन राज्यशासनाकडून रंगकर्मींना काय मदत अपेक्षित आहे याबाबत अनेक बैठका घेण्यात आल्यात आणि त्याला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. ही मदत करण्याआधी शासनाने सर्वांचा विचार केला आहे. कलाकारांना काम करायचे असेल तर मालिका, चित्रपट इत्यादींचे काम सुरु करणे महत्त्वाचे आहे. कलेचे प्रदर्शन सुरु होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. कोरोनाच्या नियमांमध्ये हे बसते का हे टास्क फोर्स ठरवते. त्यांच्यापुढे आम्ही हा प्रश्न मांडला असून अंतिम निर्णय ते घेणार असल्याचे अमित देशमुख म्हणाले.
Related Posts
Add A Comment