प्रतिनिधी/ रत्नागिरी
नागरिकांना जास्तीत जास्त नागरि सुविधा मिळाव्यात यासाठी रत्नागिरी जिल्हय़ात नगर परिषदेची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव पुन्हा शासकीय स्तरावरून ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी शहराबरोबरच दापोली, चिपळूण, खेड या नगर परिषदेची हद्द वाढ करण्यासाठी परिसरातील काही गावांचे शहरमध्ये रूपांतर करण्यासाठी हरकती मागवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
शहरात मिळणाऱया नागरी सुविधा शहरालगतच्या गावातील नागरिकांनाही उपलब्ध देता याव्यात, असा विचार शासकीय स्तरावरून करण्यात आला आहे. त्यासाठी शहरा लगतच्या ग्रामपंचायतींचा समावेश नगर परिषद हद्दीत करण्यात येणार आहे. सुरूवातीला रत्नागिरी शहरालगतच्या 13 ग्रामपंचायतींचे समावेश रत्नागिरी नगर परिषद हदीत करण्यात येणार आहे. तर दापोलीतील 2 ते 3, चिपळूणमधील चार ते पाच आणि खेडमधील चार ते पाच गावांचा नर परिषद हद्दीत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली.
रत्नसागर बीच रिसॉर्टची मुदत संपली, जिल्हाधिकाऱयांकडून कार्यवाही
भाटय़े समुद्रकिनारी असलेल्या रत्नसागर बीच रिसॉर्टच्या कराराची मुदत संपली आहे. याबाबतची नोटीस बजावून ही जागा प्रशासनाने ताब्यात घेण्याचे सूचना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिली. रत्नसागर बीच रिसॉर्टने 30 वर्षाचा करार केला होता. ही मुदत सप्टेंबर 2020 मध्येच संपलेली असतानाही त्यांनी ही जागा शासनाच्या ताब्यात दिलेली नाही त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.