उपमुख्यमंत्र्यांची घोषणा : 1990 मध्ये मारले गेले होते कारसेवक
वृत्तसंस्था /अयोध्या
1990 च्या गोळीबारात मारले गेलेल्या कारसेवकांच्या नावावर रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी गुरुवारी केली आहे. कारसेवक भगवान रामाचे दर्शन घेऊ इच्छित होते, पण त्यांच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या. या रस्त्यांवर स्मारक फलक लावण्यात येत असून त्यावर कारसेवकांचे नाव आणि छायाचित्र राहणार असल्याचे मौर्य यांनी अयोध्या येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
कारसेवक 1990 मध्ये अयोध्येत आले होते आणि रामलल्लाचे दर्शन घेऊ इच्छित होते, तेव्हा सत्तेवर असलेल्या समाजवादी पक्षाच्या सरकारने निशस्त्र रामभक्तांवर गोळीबार करविला होता. यात अनेक जण मारले गेले होते. जीव गमावलेल्या सर्व कारसेवकांच्या नावांवर रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत, असे मौर्य यांनी म्हटले
आहे.
रामभक्तांचे बलिदान
30 ऑक्टोबर 1990 असो किंवा 2 नोव्हेंबर 1990 मध्ये बलिदान केलेल्या रामभक्ताच्या घरापर्यंत कारसेवक मार्ग तयार केला जाणार आहे. तेथे बलिदान केलेल्या रामभक्तांची नावेही लिहिली जातील आणि त्यांची छायाचित्रेही झळकतील असे मौर्य म्हणाले. देशाच्या सुरक्षेकरता हुतात्मा झालेले जवान आणि अंतर्गत सुरक्षेकरता हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलिसांच्या घरापर्यंत आता ‘जय हिंद वीर पथ’ तयार करण्यात येणर आहे. राज्यात परीक्षेत पहिल्या क्रमांक पटकाविणाऱया विद्यार्थ्याच्या घरापर्यंतही रस्ता निर्माण केला जाईल. या रस्त्यांना स्वामी विवेकानंद मार्ग म्हणून ओळखले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.