नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी आणि शरद पवार यांची भेट घेतली आहे. पूर्व लडाख येथील परिस्थितीची त्यांनी या दोन नेत्यांना कल्पना दिली, असे बोलले जाते. मात्र, अधिकृतरित्या यावर भाष्य करण्यात आलेले नाही. या दोन नेत्यांना सिंग यांनी भारताच्या संरक्षण सिद्धतेसंबंधीही महिती दिल्याची चर्चा आहे. विद्यमान संरक्षण मंत्र्यांनी माजी संरक्षण मंत्र्यांना अशी माहिती देण्याची प्रथा आहे, असे सांगण्यात आले.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून होणार आहे. त्यात विरोधी पक्षांकडून लडाखचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. सध्या या क्षेत्रात भारत आणि चीन यांच्या सेना एकमेकांसमोर उभ्या आहेत. चीनने भारताच्या भूमीत घुसण्याचा केलेला प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे, हे आता जवळपास सिद्ध झाले आहे. हा संघर्ष सुरू झाला तेव्हा विरोधी पक्षांनी सरकारवर भूमी गमावल्याचा आरोप केला होता. तथापि अलिकडच्या काळात या आरोपातील हवा गेल्याचे दिसून येते. भारतीय सेना आपल्या भूभागाचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झालेले असून चीनला आपल्या मूळच्या स्थानी परत जाण्यास काही भागात भाग पाडण्यात आले आहे. काही भागांमध्ये आजही चीनचे सैनिक ‘नो मेन्स लँडमध्ये ठाण मांडून आहेत. तथापि, भारताच्या सैनिकांनीही त्यांना तिथेच रोखले असून कोणत्याही चीनी सैनिकाला भारताच्या प्रत्यक्ष भूमीत प्रवेश करता आलेला नाही, असे स्पष्टीकरण भारत सरकारने अनेकदा दिले आहे.
द्विपक्षीय संबंधांवर परिणाम
चीनने सीमेवर तणाव कायम ठेवला तर भारताशी असलेल्या त्याच्या संबंधांवर विपरीत परिणाम झाल्याखेरीज राहणार नाही, असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी चीनला नुकताच दिला असल्याचे वृत्त आहे.