ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानातील करौली शहरात शनिवारी चैत्र नववर्षाच्या निमित्त हिंदू संघटनांनी बाईक रॅली काढली होती. या रॅलीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. यामधून दोन समुदायांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात 42 जण जखमी झाले. तणावाची स्थिती लक्षात घेऊन करौली शहरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच आज (रविवारी) मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
हिंदू संघटनांनी काढलेली बाईक रॅली शहरातील हटवाडा बाजार भागात येताच काही समाजकंटकांनी रॅलीवर दगडफेक केली. दगडफेकीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. दोन्ही समुदाय आमनेसामने आले. त्यावेळी व्यापाऱ्यांनी भीतीपोटी दुकाने बंद केली. मात्र, तरीही डझनभर दुकाने या समुदायाने पेटवली. यावेळी दुचाकींनाही लक्ष्य करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक प्रसन्नकुमार खमेसरा फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून शहरात कलम 144 लागू केले आहे. आज मध्यरात्रीपर्यंत शहरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.
करौलीतील या घटनेची मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांनी गंभीर दखल घेतली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत तर दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन केले आहे.