ऑनलाईन टीम / मुंबई :
आशा वर्कर्स च्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने गुरुवारी घेतला. अशा सेविकांना एक तारखेपासून तीन हजार रुपये मानधन मिळणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
टोपे म्हणाले, ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 71 हजार आशा सेवकांना दिलासा मिळाला आहे. तसेच यावेळी त्यांनी कोरोना संकटात न थकता काम करण्याचे आवाहन जनतेला केले.
– शहरी भागात आरोग्य संचालकांची नेमणूक करणार
पुढे ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कडूनसुद्धा प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मुबलक औषध पुरवठा केला जात आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी भागात आरोग्य संचालकाची नेमणूक केली जाईल. त्याबरोबरच आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील तसेच मुंबईत 500 ते 600 आयसीयू बेड उपलब्ध करून दिले आहेत. त्याबरोबरच 650 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील केली आहे.
पुढे ते म्हणाले, येणाऱ्या काळात सुरक्षित आणि सतर्क राहावे लागेल. तसेच सगळं सुरळीत करायचं असेल तर खबरदारी ही घ्यावीच लागेल. यासाठी स्वतःची काळजी स्वतः देखील घेतली पाहिजे. स्वतः काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे? तर यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. तसेच घराबाहेर पडताना मास्क घालून बाहेर पडावे, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.