प्रतिनिधी/ सातारा
राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मंगळवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी काशिनाथ शेवते, प्रकाश खरात, शैलेश भोईटे, डॉ. रमाकांत साठे, दिनकर बरकडे, चंद्रकांत बरकडे, नितीन खरात यावेळी उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, राज्यामध्ये पावसाला सुरूवात झाल्यानंतर शेतकर्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची उगवण झाली नाही. याबाबत शेतकर्यांकडून राज्यभरात तक्रारीचा सूर आलेल्यानंतर संबंधित बियाणे व कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती. बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याने उगवण कमी झाल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. सोयाबीनसह मूग, उडीद ही पिके बर्यापैकी आली मात्र गेल्या दोन महिन्यांत राज्यभर झालेल्या वादळी पावसामुळे हातात आलेली पिके कापण्यापूर्वीच हातची गेली.
सध्याच्या परिस्थितीत राज्य शासनाने शेतकर्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रति हेक्टर 50 हजार रूपयांची मदत जाहीर करावी, कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावा, सोयाबीन, धान, कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी, पूर्व विदर्भात मानवनिर्मित पुरामुळे झालेली नुकसान भरपाई कोकणाप्रमाणे देण्यात यावी, राज्यात जेथे जेथे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, विदर्भ व मराठवाडा विभागात सोयाबीनवर कीड आल्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. त्याचे उत्पादन प्रमाणही निम्यापेक्षा कमी येत आहे. गेल्या महिन्यांत अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र भागामध्ये कपाशीचे बोंड सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संत्रा पिकाचेही नुकसान झाले आहे. त्या शेतकऱयांना मदत मिळाली नाही. एकूणच राज्यातील परिस्थिती निराशाजनक आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱयांना मदत मिळणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.